निष्ठावंत लटके कुटूंबाला उद्धव ठाकरेंनी दिले बळ : महापौर जयश्री महाजन

ऑक्टोबर 18, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्युज । १८ ऑक्टोबर २०२२ ।  निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावून बळ दिले त्यामुळेच अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचे चित्र महाराष्ट्रासमोर आले आहे, अशा शब्दात जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री महाजन यांनी सोमवार, दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी जळगाव येथे या विजयाचा आनंद व्यक्त केला.

jmc taxes discount mayor jayashri mahajan

महापौर सौ.जयश्री महाजन म्हणाल्यात की, अंधेरी विधानसभेचे शिवसेना नेते दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनाने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून स्व.रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचे नाव जाहीर करत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला होता.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असलेले रमेश लटके यांनी आपल्या विभागातील लोकांवर छाप पाडायला सुरुवात केली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे रमेश लटके हे लोकप्रिय झाले. शिवसेनेने त्यांना 1997 साली उमेदवारी दिली. ते मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2002 आणि 2007 च्या महापालिका निवडणूकीतही ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2014 आणि 2019 अशा दोनवेळा ते शिवसेनेतर्फे अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात निवडून आले. 11 मे 2022 रोजी त्यांचे निधन झाले. म्हणून या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी बिनविरोध निवडीबाबत महाराष्ट्र संस्कृतीचा वारसाची आठवण करून देत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत मनोगत व्यक्त केले होते. याबद्दल उध्दव शिवसेना कुटुंब आपले सदैव आभारी राहील, अशी प्रतिक्रिया त्यावर दिली होती. तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आपले दिशादर्शक विचार व्यक्त केले. आज सगळ्याच पक्षांनी बिनविरोध निवडीवर सहमती दिल्याने शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. हि बाब निश्चिततच शिवसेनेला बळ देणारी तर आहेच, परंतु निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय तसेच त्यांचा हक्क देण्यासाठी पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे हे अतिशय आग्रही असतात, एव्हढेच नव्हे तर विजयाची माळ निष्ठावंताच्या गळ्यात टाकेस्तव ते लक्ष ठेवून त्यावर कृतिशील असतात. या बिनविरोध निवडीने खर्‍या अर्थाने आज लटके कुटूंबाला न्याय मिळालाच परंतु एका महिलेला विधानसभेत बसण्याचा, बोलण्याचा तसेच महिलांचे प्रश्न मांडण्याचा अधिकारही मिळाला. ही बाब सर्व महिलांसाठी सुखद व आनंददायी अशीच आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा विषय आला तेव्हा त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार होते. परंतु महिला आणि निष्ठावंत या बाबींना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च प्राधान्य देत आपणास महापौर पदावर विराजमान केले. अशी किमया फक्त शिवसेनेतच आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now