⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

विलास सोनवणींचा मुलगा अभिमानाने सांगू शकतो ‘माझे वडील भ्रष्टाचारी नाही’ : सुनील महाजन यांचे गौरवोद्गार

महापौर जयश्री महाजन यांनी स्वतःच्या वाहनाने सोडले सोनवणींना घरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । जळगाव शहर मनपात आज अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी फळी सेवानिवृत्त होत असल्याने मोठी पोकळी निर्माण होत आहे. आजवर अनेकांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले. मनपाचे शहर अभियंता विलास सोनवणी यांचा मुलगा ‘माझे वडील भ्रष्टाचारी नव्हते’ हे गर्वाने जगाला सांगू शकतो. आम्हाला असे अधिकारी लाभले हे सर्वांचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी काढले.

जळगाव शहर मनपाचे ४३ अधिकारी, कर्मचारी आज दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. मनपाच्या मुख्य सभागृहात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. मंगळवारी सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये शहर अभियंता व्ही. ओ. सोनवणी, अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, पाणीपुरवठा उपअभियंता गोपाल लुल्हे, आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक संजय अत्तरदे, शरद बडगुजर व स्वच्छता निरीक्षक काशिनाथ बडगुजर, आयुक्त यांचे वाहन चालक कांतिलाल विठ्ठल पाटील, नानाभाऊ काळे आदींसह ४३ जणांचा समावेश होता.

विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सांगितले की, मनपात आजवर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना जवळून पाहण्याचा, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आला. शहर अभियंता सोनवणी अत्यंत इमानदार आणि नेहमी मितभाषी असलेले व्यक्तिमत्व होते. सच्चा आणि प्रामाणिक व्यक्तीसोबत कार्य करताना काही वेगळाच अनुभव असतो. आजवर या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जळगावसाठी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले. भविष्यात देखील मनपाला सोनवणी यांच्यासारखे इमानदार अधिकारी, कर्मचारी भेटतील आणि जळगावच्या विकासात आपले योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मनपात यथोचित सन्मान झाल्यावर वाजत, गाजत मिरवणूक काढून अधिकारी, कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. इतकंच नव्हे तर महापौर जयश्री महाजन यांनी स्वतःच्या वाहनाने शहर अभियंता विलास सोनवणी यांना घरी सोडले. महापौरांच्या कृतीने सोनवणी परिवार आणि कर्मचारी भारावले होते. जळगाव मनपातील ४३ अधिकारी, कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून नवीन पदभरतीचा आकृतीबंध लवकर मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.