⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जामडीतून एकाचवेळी निघाल्या तीन अंत्ययात्रा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । दोन दिवसापूर्वी एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली होती. या घटनेत कारमधील चाळीसगाव येथून जवळच असलेल्या जामडी येथील परदेशी कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यात जामडी गावातील तिघे आणि वडजी (ता.भडगाव) येथील एकाचा मृत्यू झाला. जामडीतील तिघा मृतांवर २४ रोजी दुपारी १२ वाजता हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले.

गावात एकाचवेळी तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे गावात एकाही घरात चूल पेटली नाही. तिघेही घरातील कमावते असल्याने, त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. गावातील विजयसिंग परदेशी (वय ५८), चतरसिंग परदेशी (वय ३८) आणि तुषार परदेशी (वय ३५) अशा तिघांची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाली.

गावालगत स्मशानभूमीत तिघा मृतांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार झाले. यावेळी परिसरातील १० ते १२ गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते. जामडीसह परिसरातील गावांमध्येही गुरुवारी शोकमय वातावरण होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा :