⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात, अन्… खडसेंचा टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. दानवेंच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी टोला लगावला आहे. भाजपचे (BJP) अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. आता रावसाहेब दानवे यांनीही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. मात्र, दानवे हे फक्त स्वप्न पाहतात आणि मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा चिमटा खडसे यांनी काढला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

काय म्हणाले होते दानवे?

राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहेत. तर सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) सरकार खंबीर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं आश्वस्त करण्यात येत आहे. अशात महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. “महाविकास आघाडीतील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील”, असं धक्कादायक विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. चंद्रकांत दादांनी, तर अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे गेल्या म्हणत त्यांनी पाटलांवर टीका केली. आता पाटील यावर काही बोलतात का, हे पाहावे लागेल.

दानवेंच्या नुसत्याच गप्पा…
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात आहेत. दानवे यांच्या फक्त मनोरंजनाच्या गप्पा सुरू आहेत. खरे तर आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे दानवे यांनी नुसते हवेत तीर सोडू नये, असा उल्लेखही त्यांनी केला. सध्या राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना अशी आरोप-प्रत्यारोपाची राळ उठतेय. आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा ठिणग्या पडतानाही दिसत आहेत.