जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाचा विचार करून भुसावळ, जळगाव मार्गे धावणाऱ्या बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वे सेवेचा परिचालन कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी १५ जुलैपर्यंत धावणारी ही विशेष रेल्वे आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे या मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष तसेच गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड–बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष या दोन्ही गाड्यांचा परिचालन कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत दोन्ही गाड्यांच्या मिळून १३४ फेऱ्या होणार आहेत.

विशेष म्हणजे, या गाडीच्या वेळापत्रकात, मार्गात किंवा निर्धारित थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच त्याच वेळापत्रकानुसार रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे.
बडनेरा–नाशिक रोड विशेष मेमू रेल्वे गाडीला गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच अन्य कामानिमित्त मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. विशेषतः भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही अनारक्षित विशेष रेल्वे प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे.








