⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

केंद्राच्या खासगीकरण धाेरणाच्या विरोधात जनरल इन्शुरन्स, विमा कर्मचाऱ्यांचा उद्या संप

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धाेरणाला विराेध करण्यासाठी १७ मार्च राेजी नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या चार कंपन्यांचे, तर १८ मार्च राेजी एलआयसीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. जिल्ह्यातील एलआयसीचे २०० कर्मचारी या संपात सहभागी हाेतील.

डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढवली. या अध्यादेशाला कायद्याचे स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे, केंद्र सरकारच्या खासगीकरण धाेरणाला विराेधासाठी देशातील जनरल इन्शुरन्स आणि एलआयसीचे कर्मचारी लागाेपाठ दाेन दिवस संपावर जाणार आहेत.

खासगी विमा कंपन्या वगळता सरकारी सगळ्याच विमा कंपन्यांचे कामकाज ठप्प हाेणार आहे. संयुक्त किसान माेर्चा व केंद्रीय कामगार संघटनांचा या संपाला पाठिंबा असून संयुक्त निर्णयानुसार या तीनही संपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. १५ मार्च हा दिवस खासगीकरण विराेधी दिन म्हणून पाळण्यात आला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात बँक व विमा व्यवसायाचे खासगीकरण व केंद्र सरकारची मालकी विक्री करणे या भूमिकेला या संपातून विराेध नाेंदविला जाणार आहे.

भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान

0
dilip tiwari jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव मनपाची गेली निवडणूक (सन २०१८) तशी लुटूपुटूची लढाई ठरणार होती. भाजप-शिवसेना युती होणार हे गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांनी एकत्रित सांगितले होते. युती झाली असती तर विरोधातील इतर पाला-पाचोळा होते. तसे ते आजही आहेत. मनपात केवळ ३ पक्षांचे नगरसेवक निवडून येतात. ज्यांचे नगरसेवक निवडून आलेले नाहीत ते पाला-पाचोळा. युती होणार अशा अपेक्षेत जैन निवांत होते. पण भाजपत स्वतंत्र लढण्याचा दबाव वाढल्यानंतर महाजन यांनी युती मोडीत काढून ‘मैत्रिपूर्ण लढत करु या’ असा निरोप एका खुळखुळ्यासह जैन यांना दिला. ही मैत्रिपूर्ण लढत म्हणजे, प्रचार जास्त अंगात आणायचा नाही आणि भरपूर पैसा ओतायचा नाही या तोंडी समन्वयातून करायची सुद्धा ठरले.

पण गिरीश महाजन यांनी निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधून शिवसेनेला तोंडघशी पाडायचे ठरविले. सत्ताप्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट जेव्हा असते तेव्हा त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा पवित्रा घ्यावा लागतो. महाजन यांनी तो पवित्रा घेतला पण जैन हे महाजन यांच्या मैत्रीचा खुळखूळा वाजवत बसले. तसे पाहिले तर जैन यांच्याकडे मनपा निवडणूक जिंकण्यासाठी फारसे प्रचाराचे मुद्दे नव्हतेच. घरकूल घोटाळा, तुरुंगवारी, विधानसभा निवडणुकीत पराभव हे नकारात्मक मुद्दे होते. शहर विकास आघाडीच्या कारकिर्दवर जळगावकर, व्यापारी, उद्योजक नाराज होतेच. हे लक्षात घेऊन जैन यांनीही शहर विकास आघाडी ऐवजी शिवसेनेच्या झेंड्याखाली मनपाची पहिली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. अशातच भाजप सुद्धा स्वतंत्रपणे प्रतिस्पर्धी झाला.

महाजन हे जैनांशी मैत्रीची भाषा बोलत होते पण निवडणूक जिंकायला लागणारे उमेदवारही जैन यांच्या तालिमीत तयार झालेले घेत होते. शिवसेना, नगर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा सर्वच पक्षातून उमेदवारांची आयात महाजन यांनी केली. महाजन किंवा भाजपवरील अती प्रेमातून ही आयात झाली असावी ? या प्रश्नाचे उत्तर कधीही ‘हो’ असे असूच शकत नाही. साम, दाम, दंड, भेद याचा वापर महाजन यांनी केला. ते सहाजिक होते, महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे कोणाला तडीपारीचा, कोणाला चौकशांचा, कोणाला ठेकेदारीचा लॉलीपाप देऊन भाजपचा निवडणूक तंबू उमेदवारांनी भरला. तंबूत एवढी तोबा गर्दी झाली की मूळ भाजपचे असलेल्या उमेदवारांना डावलले गेले. भाजपची ही निवडणूक जिंकण्याकडे होणारी वाटचाल फसवी, दिखाऊ होती. निष्ठा नसलेले लोक सोबत घेतल्याने त्यात प्रतिष्ठा नव्हती आणि टाकाऊ सुद्धा होती.

‘मी जळगावच्या राजकारणात टिकून आहे’, हे जैन यांना दर्शविणे आवश्यक होते. पण गिरीश महाजन यांच्यासाठी जळगाव मनपाची निवडणूक आणि तीत मिळू शकणारा संभाव्य विजय हा फार मोठ्या राजकीय संधीचा भाग होता. पण महाजन यांचे निवडणूक प्रचारापासूनचे नियोजन घिसाडघाई, उथळ, शाब्दीक खेळ व कोट्या करण्याचे राहिले. जळगाव शहरात राजकारणाचे नवे पर्व सुरू करायला जळगावकर उत्सुक आहेत एवढ्या एकाच मानसिकतेचा तात्कालिक लाभ घेणारे नियोजन महाजन यांनी केले. एवढेच नव्हे तर महाजन यांची भाषा सुध्दा उथळ आश्वासने देणारीच होती. ‘एक वर्षात जळगाव बदलून दाखवतो’ हे वाक्य त्याच उथळपणाचे उदाहरण.

जळगावकरांची दिशाभूल करणारा, खंडीभर आश्वासनांचा जाहिरनामा भाजपने जळगावकरांच्या हाती दिला. त्याचे शिर्षक होते, ‘विसंबून कुणावरही नसलेला, सक्षम, दमदार व खऱ्या वचनांचा’ आज तीन वर्षानंतर महाजन ना जळगाव बदलू शकले ना वचननाम्यातील शिर्षकाशी प्रामाणिक वागले. हा जाहिरनामा, उसनवार उमेदवार, पक्षाकडून मिळालेली रसद (म्हणजे काय ? हे विचारणारा ठार मूर्ख) आणि जळगावकरांचीही बदलाची इच्छा या बळावर भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकल्या. १५ जागा शिवसेनेला कशाबशा मिळाल्या. एमआयएम ३ जागा जिंकली. बाकी पाला-पाचोळा कायम होता.

जळगाव मनपा भाजपने जिंकली. पण शहराचा कारभार चालविण्याचे कौशल्य ना महाजन यांच्यात दिसले ना आयात केलेल्या मंडळींमध्ये दिसले. जवळपास अडीच वर्षांचा काळ ठराविक समर्थकांची कुटुंबगिरी, कोंडाळेगिरी आणि पडद्या मागील कमिशनगिरीतच गेला. पहिले महापौरपद जेव्हा आमदाराच्या घरातच दिले गेले त्याच दिवशी मनपातील भाजप फुटीच्या उंबरठ्यावर गेली. भाजपची नंतरची सत्ता लेवा, कोळी, मराठा या सामाजिक गणितावर विभागली गेली. कार्य, कर्तृत्व, दृष्टी या गुणांचा विचारच झाला नाही. वॉटरग्रेसच्या ठेक्यात कोणी कमिशन खाल्ले याची जेव्हा शहरात चर्चा सुरू झाली तेव्हाच गल्लीबोळातील भाजप नगरसेवकांनाही गटार, रस्ते, पथदीप, सफाई, दुभाजक अशा कामांमध्ये कमिनश मिळावे असे वाटू लागले. याच इर्षेतून २५ कोटींची कामे सार्वजिक बांधकामला की मनपाला हा वाद रंगला. कोण कशाला पाठिंबा देतो आणि कोण विरोध करतो हे सोशल मीडियात बोलले जाऊ लागले. कमिशनचा असाच वाद शिवाजी नगर उड्डाण पुलाजवळील हाय टेंशन केबल स्थानांतराचा होता. हे काम महावितरणला की मनपाला या विषयाने नगरसेवकांच्या असंतोषाची वाफ बाहेर काढली.

दरम्यान, भाजपचा पोकळ आश्वासनांचा जाहीरनामा गटांगळ्या खाऊन अमृत योजनांच्या खड्ड्यात गाडला गेला. भाजपने काय काय खोटेनाटे त्यात लिहिले होते हे आज डोळ्यांसमोर येते. प्रधानमंत्री आवास योजना, सूट मालमत्ता करात, कर्मचारी विकास, अग्निशमन दल, शिक्षण, उड्डाणपूल, महिला सक्षमीकरण, युवक व क्रिडा विकास, सुरक्षित जळगाव, वाहतुकीचे नियोजन व पार्किंग व्यवस्था, आरोग्य व स्वच्छता, उद्याने व विकास, फेरीवाला नियोजन, स्मशानभूमी, आपत्ती व्यवस्थापन, समांतर रस्ते, उद्योग विकास, अमृत योजना हे विषय महाजन यांनी स्वतः कधी वाचले का ? महाजन या विषयावर पत्रकार परिषदेत कधी बोलले आहेत का ? याचे उत्तर ‘महाजन ठरले बोलघेवडे.’ ना नियोजन ना अंमलबजावणी. महाजन मंत्री होते पण जळगावचे पालक जाले नाही. हे संकटमोचक हवेतच उड्डाणे करीत राहिले.

जळगाव शहरातील बदलाची अशीच एक संधी भाजपला यापूर्वीही मिळाली होती. लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला होता. भाजपने त्यालाच लाच खाऊ ठरवून बेड्या घालून शहरात पायी फिरवले होते. एका पार्टीत मारले ही होते. सआज तीच अवस्था भाजप नेत्यांची आहे. भाजपचा बहुमताचा डोलारा कोसळतो आहे. संकट मोचक म्हणून महाराष्ट्रभर फिरणारे आज जळगावच्या रस्त्यावर एक एक नगरसेवक शोधत आहेत. हा भ्रमनिरास जळगावकरांचा नाहीच. जळगावकरांनी ३३ वर्षे सुरेशदादांना सत्ता दिली. त्यांनी अनेक विकास प्रकल्प केले सुद्धा. पण भाजपला एक हाती सत्ता देऊनही तीन वर्षात ५७ नगरसेवकांचा अंतर्गात विश्वास मिळवता आला नाही. तेच फुटून पळाले. भाजपने जाहीरनाम्यात छापलेले शेवटचे पान सर्व संबंधितिंचे तोंड काळे करणारे आहे.

जय जय … श्रीराम ….

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार 

हे देखील वाचा :

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

भाजपच्या फुटीर नगरसेवकांना गटनेत्यांची ‘वॉर्निंग’

0
bhagat balani jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । शहर मनपातील सत्ताधारी भाजपचे ३० नगरसेवक फुटीर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि.१८ मार्च रोजी महापौर, उपमहापौर निवडीसाठी निवडणूक होणार असून कुणीही गडबड करू नये यासाठी भाजप गटनेते भगत बालाणी यांनी माध्यमात जाहिरात देत व्हीप जारी केला आहे. व्हीपच्या माध्यमातून त्यांनी कायद्याची जाणीव करून देत सर्वांना सूचनाच दिली आहे.

भाजप गटनेते भगत बालाणी यांनी प्रसिद्ध केलेल्या पक्षादेशमध्ये म्हटले आहे की,

पक्षादेश (व्हिप)

सन्मा. सर्व नगरसेवक /नगरसेविका भारतीय जनता पार्टी महानगरपालिका, जळगाव

महोदया,
मी, भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून आपणांस पक्षादेश (व्हिप) देत आहे की, दिनांक १८ मार्च २०२१ रोजी जळगांव शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आहे. तरी आपण सदर निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे महापौर व उपमहापौर पदाचे अधिकृत उमेदवार यांना वेळेवर ऑनलाईन उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार ठरतील त्यांना मतदान करावे. असा पक्षादेश (व्हिप) भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून आपणांस देत आहे.

सदर पक्षादेशाचे (व्हिपचे) आपण पालन करणे बंधनकारक आहे. सदर पक्षादेशाचे (व्हिपचे) पालन करण्यास आपण कसूर केल्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ नुसार महानगरपालिका सदस्य म्हणून अनर्ह होण्यास पात्र रहाल याची नोंद घ्यावी. वरील पक्षादेशाचे (व्हिप)चे आपण काटेकोरपणे पालन करावे.

आपला विश्वासू
(बालाणी भगतराम रावलमल) गटनेता, भारतीय जनता पक्ष जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव

अशा प्रकारे भाजपचे नगरसेवक फुटू नये म्हणून त्यांना अगोदरच सूचना देत कारवाई होऊ शकते याची जाणीव करून देण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा : 

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव महानगरपालिकेत विरोधकांचा घोडेबाजार; गिरीश महाजनांची टीका

आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

नऊग्रहांनी बदलले जळगाव मनपाचे राजकारण

0
dilip tiwari

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव महानगरपालिकेत दि. 18 मार्चला सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित. भाजपची सत्ता पायउतार होऊन शिवसेनेच्या सौ.जयश्री सुनील महाजन या महापौर तर भाजपचे बंडखोर कुलभूषण विरभान पाटील हे उपमहापौर होणार हे निश्चित. या दोघांचे मताधिक्य एकूण 75 पैकी 45च्या वर असेल. जळगाव मनपाच्या राजकारणात होणारा हा बदल नऊग्रहांच्या अतिशक्तीशाली अशा योगायोगातून होत आहे.

भाजप अंतर्गत नगरसेवकांची नाराजी दूर करण्याकडे आ.गिरीश महाजन व आ.सुरेश भोळे यांनी दुर्लक्ष केल्यानंतर ‘नऊग्रह मंडळ’ म्हणून स्थापन केलेल्या स्वतंत्र गटातील नगरसेवकांनी अवघ्या सव्वा महिन्यात भाजपच्या सत्तेची ग्रहदशा बदलवून टाकली. या नऊग्रहांची नावेसुद्धा या वृत्तात खाली आहे. साधारणपणे महिनाभरापूर्वी शिवाजी नगर उड्डाणपुलाजवळ हायटेंशन केबलच्या स्थानांतराच्या कामाची निविदा निघाली होती. एक कोटी साठ लाख रुपये या कामावर खर्च होणार होते. हे काम महावितरण कडून करावे की मनपामार्फत करावे याविषयी नऊ नगरसेवक आणि भाजप नेत्यांचा वाद झाला होता. तथापि हे काम महावितरणकडे गेल्यानंतर नाराज असलेल्या या नऊ नगरसेवकांनी ‘नऊग्रह मंडळ’ स्थापन केले.

मनपातील भाजपच्या सत्तेची कुंडली बदलायला दिलीप बबनराव पोकळे, कुलभूषण पाटील, सुधीर पाटील (सौ. प्रतिभा यांचे पती), किशोर रमेश बाविस्कर, कुंदन काळे (सौ. रेश्मा यांचे पती), गजानन देशमुख (सौ. प्रतिभा यांचे पती), चेतन गणेश सनकत, नवनाथ विश्वनाथ दारकुंडे आणि भरत सपकाळे (सौ. रंजना यांचे पती) या नऊग्रहांची युती कारणीभूत ठरली. अवकाशातील सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनि, राहू, केतू यांना नऊग्रह मानले जाते. यातील बर्‍याच ग्रहांच्या युतीच्या प्रसंगी विविध प्रकारच्या आपत्ती ओढवत असतात. फलज्योतिषात या नऊग्रहांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधिंनी हायटेंशन केबलचे काम महावितरणला दिल्यानंतर भाजपतील नाराज नऊग्रहांनी ‘नऊग्रह मंडळ’ या नावाने व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप सुरु केला. याच ग्रुपमध्ये भाजपमधील इतर नाराज नगरसेवकांशी संपर्क सुद्धा सुरु झाला. ‘हा नाराज.. तो नाराज.. आणि सारेच नाराज..’ असे ग्रुपमध्ये सगळेच गोळा होत गेले. ही संख्या जवळपास 25 पर्यंत गेली. तरीसुद्धा भाजपच्या लोकप्रतिनिधींना याची कोणतीही खबरबात नव्हती.

नाराज नगरसेवकांची संख्या जवळपास 30 पर्यंत जाईल हा अंदाज आला. तेव्हा लोकसभेच्या रावेर मतदार संघातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्या संपर्कात हे नऊ ग्रह आलेत. त्यांनी मध्यस्थ म्हणून डॉ.सुनील सुपडू महाजन व गजानन मालपुरे यांना सोबत नेले. जळगाव मनपात भाजपचे बिर्‍हाड उचलता येईल हे पारकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या सर्वांना मुंबईत सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांची भेट घालून दिली. शिवसेनेच्या अशा तोडफोड व जुगाड कार्यात राऊत यांना विशेष रस असतो. त्यांनी जळगाव मनपा संदर्भातील इत्थंभूत माहिती घेतली. नंतर मुख्यमंत्री व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कानावर हा विषय घातला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सख्य आणि जळगाव मनपात आ.गिरीश महाजन यांचे नेतृत्व हे लक्षात घेऊन जळगाव मनपावर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकली गेली. महाजन-फडणवीस यांचे जुने हिशोब चुकते करण्यासाठी अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्यवाही करण्याचे नियोजन मुंबईत ठरले. याची माहिती शिवसेना गटनेता, शिवसेना संपर्कप्रमुख यांनाही नव्हती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही एन्ट्री उशिरानेच झाली. अशा प्रकारे मुंबईत नियोजन झाल्यानंतर जळगावातून भाजपचे फुटीर नगरसेवक उचलण्याची कार्यवाही सुरु झाली.

जळगाव महापालिकेवर भाजपच्या फुटीर नगरसेवकांची सत्ता आणण्यात मुख्यमंत्री ठाकरे यांना कोणताही रस नव्हता. मात्र, सत्ता आणायची तर शिवसेनेच्या महापौरांच्या नेतृत्वात आणि बंडखोरांपैकी एकाला उपमहापौर करुन दोघांच्या नेतृत्त्वात सत्तांतर केले जाईल, असे ठरले. त्यामुळेच शिवसेनेशी निष्ठावंत असलेले सुनील महाजन यांच्या पत्नी सौ.जयश्री आणि ‘नऊग्रह मंडळा’च्या स्थापनेत पुढाकार असलेले कुलभूषण पाटील यांना अनुक्रमे महापौर व उपमहापौरची संधी दिली गेली. शिवसेनेतर्फे अत्यंत शांतपणे सुरु असलेली ही कार्यवाही भाजपला फार उशिरा कळली. तोपर्यंत भाजपतील जवळपास 27 फुटीर मुंबईकडे रवाना झालेले होते.

मित्राने निभावला मैत्रीधर्म

जळगाव मनपात अडीच वर्षांपूर्वी भाजपची सत्ता स्थापन व्हावी म्हणून आ.गिरीश महाजन यांनी शिवसेनेतील अनेक नगरसेवक निवडणूकीपूर्वी आयात केले होते. अर्थात तेव्हासुद्धा भाजपने घोडेबाजारच केला होता. जळगाव मनपात सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वात अगोदर नितीन लढ्ढा आणि त्यांच्या नंतर ललित विजय कोल्हे यांना महापौर पदाची संधी मिळाली होती. दोघांच्यावेळी उपमहापौरपदी सुनील महाजन हेच होते. लढ्ढा आणि कोल्हे यांना हनुमानाप्रमाणे महाजन यांनी सहकार्य केले. प्रसंगी एक पाऊल मागे राहून मला हे हवे, किंवा मला ते हवे असा आग्रह महाजन यांनी धरला नाही. कोणत्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी पदाचा अनुभव नसताना ललित कोल्हे यांची कारकीर्द प्रभावी ठरली. त्यात महाजन यांचा सिंहाचा वाटा होता. मनपातील नऊग्रहांनी भाजपची सत्ता संपुष्टात आणण्याचा चंग बांधल्यानंतर ललित कोल्हे हे जुन्या मित्राच्या मदतीला धावले. ते आणि त्यांच्या सोबत इतर पाच.. शिवसेनावासी झालेत. भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याची सर्वात पहिली उघड प्रतिक्रिया ललित कोल्हे यांनी दिली. ते म्हणाले, ‘भाजपला जय श्रीराम’!

खडसे, जगवाणी यांचे सहकार्य

भाजपची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी ‘नऊग्रह मंडळ’ यांनी प्रयत्न केलेले आहेत. या भाऊगर्दीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणारे आणि भाजपचे निष्ठावंत सुनील वामनराव खडके फुटिरांमध्ये सहभागी झाले. अर्थात हा निर्णय घेण्यापूर्वी खडके यांनी इतरांना खडसेंच्या दारात नेले. तेथे उपमहापौर पद मागण्याचा प्रयत्नही झाला. ते काही जमले नाही. खडके जात आहेत म्हटल्यावर माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांचे समर्थक मनोज दयाराम आहुजा यांनी सुद्धा नऊग्रहांची पालखी खांद्यावर घेतली.

अशा प्रकारे जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या सत्तेचा अध्याय आटोपण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ‘नऊग्रह मंडळ’ यांनी निभावली आहे. चलो.. आगे आगे देखो… होता है क्या?

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार

सावधान : आज जळगावात ९९२ कोरोना बाधित आढळले; शहरात सर्वाधिक ४३० रुग्ण

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाही. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असून आज ९९२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आता एकुण ७१ हजार ६१९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६२ हजार ३१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार ८५२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज ५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण आकडा १४४९ इतका आहे.

आज जळगाव शहर- ४३०, जळगाव ग्रामीण-५४, भुसावळ-७३, अमळनेर-१५, चोपडा-९७, पाचोरा-२१, भडगाव-०८, धरणगाव-५०, यावल-३२, एरंडोल-२५, जामनेर-०५, रावेर-२५, पारोळा-१५, चाळीसगाव-९८, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातून १२ असे एकुण ९९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगावकरांनी लवकरात लवकर नियमांचे पालन करून कोरोनाला अटकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मागील काही दिवसापासून शहरात दररोज तीनशेच्या वर रुग्णांची संख्या येत होती. मात्र आज ४०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. शहरात तीन दिवसाचा जनता कॅर्फ्यू लावून देखील कोरोनाला म्हणावे तेवढा रोखण्यात अपयश येत आहे.

जागरूक ग्राहक बना ; जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

0
world consumer day

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने सदर कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. 

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी आणि सदस्य हे ऑनलाईन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी जागतिक ग्राहक दिनाचे वैशिष्ट्य सांगून ग्राहक ही संकल्पना केवळ स्थानिक नसून वैश्विक असल्याने जगभरात ग्राहक संरक्षण , ग्राहकांचे हक्क अबाधित राखणे, त्याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणे सुरू असते, ग्राहक दिनाच्या माध्यमातून याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करणेत येत असल्याचे सांगितले. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक ग्राहक दिनाचे निमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 बाबत ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर माहिती दिली.

ग्राहक आयोगात दाखल करावयाच्या तक्रारीच्या खर्च मर्यादेत झालेली वाढ, ऑनलाईन फसवणूक झाल्यास करता येणारी तक्रार, ऑनलाईन तक्रार दाखल करणे आणि ऑनलाईन सुनावणी याबाबत तपशीलवार माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 आणि ग्राहक संरक्षण कायदा,2019 यातील महत्वाचे बदल याबाबतही त्यांनी मार्गदर्शनात केले.

या कार्यक्रमात सहाय्यक नियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग श्री. जाधव तसेच अन्न  आणि औषध विभागाचे सहा. आयुक्त श्री.यो. को. बेंडकुळे यांनी आपल्या विभागाकडून ग्राहक संरक्षण बाबत करणेत येत असलेल्या बाबींची माहिती दिली.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमात सर्व ग्राहकांना शुभेच्छा देताना जागरूक ग्राहक बनण्याचे आवाहन केले. ग्राहकाच्या अधिकाराची जपणूक झाली पाहिजे, ग्राहक आयोगाची भूमिका यात अत्यंत महत्वाची आहे. ऑनलाइन खरेदीचे वेळी फसवणूक होण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ग्राहकांनी याबाबत अधिक खबरदारी घ्यावी. कुठल्याही ऑनलाइन लिंक वर खात्री करूनच क्लिक करावे, लॉटरी किंवा बक्षीस मिळाल्याचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना अनोळखी लिंक देऊन जाळ्यात ओढले जाते. कुठलीही बँक ग्राहकांना OTP साठी फोन करत नसते. तेव्हा ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रसिध्द कंपनीचे नावात किरकोळ बदल करून देखील ग्राहकांना फसवले जाते. अशा स्वरूपाचे फसवे व्यवहार केवळ जागरूक ग्राहकच रोखू शकतात म्हणून ग्राहकाने आता जागरूक ग्राहक होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमती मनोरे यांनी तर आभार रेखा सावंत यांनी मानले.

माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे निधन

0
dr sudhir meshram passed away

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे आज दुपारी नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. डॉ. सुधीर मेश्राम यांच्या रूपाने एक कर्तबगार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 

डॉ. सुधीर मेश्राम यांनी अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मायक्रो-बायोलॉजीत एम.एस्सी. आणि नंतर पीएच.डी. पूर्ण केली. ते नागपुर विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभागप्रमुख होते. त्यांनी या विषयात सखोल संशोधन केले होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते. तर त्यांनी आपल्या संशोधनाचे काही पेटंट सुध्दा मिळविले होते.

यानंतर डॉ. सुधीर मेश्राम हे ८ सप्टेंबर २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते.  काळात त्यांनी विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रयोगशाळा ते जमीन हा प्रयोग देश पातळीवर वाखाणण्यात आला होता.

कोर्ट चौकातून व्यावसायिकाची बॅग लांबवली !

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जळगाव शहरातील कोर्ट चौकात कृषक भवन येथे बेकरी असलेल्या व्यावसायिकाची बॅग लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौलतनगरातील रहिवासी दिनेशकुमार अर्जुनकुमार ललवाणी वय-३२ यांची पंजाबराव कृषक भवन येथे नटखट नावाने बेकरी आहे. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता ते बेकारी उघडण्यासाठी पंजाबराव कृषक भवन आले असता त्यांनी स्वतःची मोटार सायकल पार्क करुन जवळ असलेला बॉक्स व एक मरुन रंगाची बॅग घेऊन ते दुकानाजवळ आले. बॉक्स व बॅग दुकानाच्या जवळ मोकळ्या जागी ठेऊन बँगमधून चाबी काढून दुकान उघडले.

तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती कॅटबेरी घेण्यासाठी दुकानात आला व तो कॅटबेरी घेऊन रेल्वेस्टेशनकडे निघुन गेला. त्यानंतर ललवाणी हे बॅग घेणेसाठी आले असता त्यांना बॅग आढळून आली नाही. ललवाणी यांनी बॅगचा आजु-बाजूला शोध घेतला असता ती मिळून न आल्याने बॅग चोरी झाल्याची त्यांची खात्री पटली. बॅगेत १५ हजार रोख रक्कम, ६ हजाराचा मोबाईल यासह महत्वाची कागदपत्रे होती. ललवाणी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

शिक्षकांना सुद्धा कोरोना लस देण्यात यावी

0
teachers should also be vaccinated against corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कोरोना लस देण्यात यावी,  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना करण्यात आली.

कोरोना काळात आघाडीवर असणारे घटक मग ते आरोग्यासाठी असणारे डॉक्टर्स,नर्सेस,स्वच्छता कर्मचारी,पोलीस आदी त्यानंतर हाय रिस्क गटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर न्यायालयिन कर्मचारी, जजेस, वकिल, पत्रकार यांना प्राधान्य देण्यात आले. पण दुर्दैवाने शिक्षकांना मात्र ही लस देण्यात आली नाही.  लॉक डाऊन काळात शिक्षकांनी शासनाने निर्देशीत केलले सर्व कार्य तत्पतरतेने पार पाडले जसे रेशन दुकानावर ड्युटी, क्वारंटाइन झोन मधील ड्युटी, सर्वेक्षण, महामार्गवरील ड्युटी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अशा अनेक शासनाच्या कामांना शिक्षकांनी तत्परतेने पार पडले आहे.

म्हणून आपण शिक्षकांना सुद्धा लस मिळणेसाठी प्राधान्य द्यावे व  लवकरच जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना लस देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे तसेच राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडीतील महानगर अध्यक्ष हेमंत सोनार,कार्याध्यक्ष मनोज भालेराव, उपाध्यक्ष विजय विसपूते,महानगर सचिव श्री.प्रवीण धनगर यांच्या तर्फे  निवेदनातून देण्यात आले.  जिल्हाधिकारी यांनी निवेदन मंजुर करून लवकरच शिक्षकांना लस देण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले.