⁠ 

पुनर्भरणाने अंजनी धरण गाठणार शंभरी!

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यात सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी जीवनदायी ठरणारे अंजनी धरण आतापर्यंत पावसाच्या पाण्याने व पुनर्भरणाने ७६ टक्के भरले आहे. यंदाचा पावसाळा परतीच्या वाटेवर असल्यामुळे केवळ अंजनी पाणीसाठा धरणात होण्याकरिता पुनर्भरण ही एकमेव उपाययोजना प्रभावी ठरत आहे. अजून पंधरा दिवस जर पुनर्भरण सुरू राहिले तर अंजनी धरणात १०० टक्के पाणीसाठा होऊ शकतो, अशी माहिती गिरणा पाटबंधारे उपविभागाचे एसआर पाटील यांनी दिली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात १०३ दिवसांत अंजनी धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा झाला. कारण धरणाच्या क्षेत्रात व अंजनी नदीच्या उगम परिसरात अवघा ४१४ मिलिमीटर पाऊस झाला ७०० ते ८०० मिलिमीटर पाऊस झाला तरच अंजनी धरण पूर्णक्षमतेने भरू शकते. थोडक्यात यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे अंजनी धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊ शकला नाही. आता पुनर्भरणामुळे अंजनी धरण पूर्ण भरणार काय ? याकडे लक्ष लागले आहे.

यावर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी धरणात २१ टक्के जलसाठा होता. पुनर्भरणाने धरणात ५५ टक्के साठा झाला. अपुऱ्या पावसामुळे डाव्या कालव्याद्वारे धोत्रा एस्केपच्या माध्यमातून अंजनी धरणात पाणी टाकण्यात येत आहे. रोज सुमारे १५० क्सूसेकने धरणाचे पुनर्भरण होत आहे. एकंदरीत अंजनी धरण क्षेत्रात व अंजनी नदीच्या उगम परिसरात जर पुरेसा पाऊस झाला नाही तर अंजनी धरण हे रिकामी वाटी ठरू शकते. यावर्षी गिरणा धरण १०० टक्के भरल्यामुळे जामदा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने अंजनीचे पुनर्भरण होत आहे. अंजनी धरणात पाणीसाठा होण्यासाठी गिरणा धरणावर अवलंबून राहावे लागत आहे.