⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

वाट बघा, सीडी येणार खडसेंच्या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे ‘त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेल,’ हे वाक्य राज्यभर गाजले. त्याच्या या विधानानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र बऱ्याच कालावधी उलटूनही खडसे यांची सीडी काही बाहेर आली नाही. खडसे यांच्या सीडीमध्ये नेमके काय आहे? ते अद्याप कोणालाही माहिती नाही. मात्र आता खडसे यांनी पुन्हा एकदा याच सीडीला घेऊन सूचक इशारा दिलाय.

माझी सीडी नक्की येणार आहे. आता काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा, असं सूचक विधान खडसे यांनी केलंय. खडसे यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

दरम्यान, राज्य सरकारने दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. यावरून होत असलेल्या टीकेला देखील खडसे यांनी जोरदार प्रत्युतर दिल आहे. महाराष्ट्रात वाईनला विरोध करायचा आणि मध्य प्रदेशात बिअर विक्रीला परवानगी द्यायची. गोव्यात गल्ली गल्लीत दारू मिळते. मध्यप्रदेश हा मद्य प्रदेश केलाय. देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात दारू विकणार नाही, असं जाहीर करावं असं आव्हान देतो. त्यांनी जाहीरनाम्यात हा मुद्दा टाकावा म्हणजे त्यांची भूमिका समोर येईल,” असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला.

ओबीसी आरक्षण न मिळण्याला भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. केंद्र सरकारने ओबीसींवर अन्याय केला. वेळेवर इम्पेरिकल डेटा मिळाला असता राज्य सरकारला काही करता आलं असतं. ओबीसींवर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे. ओबीसींचं राजकारण कमी करण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक पाहून नाटक केलं आणि कायदा केला मात्र तो टिकणार नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर केली.

सीडी येणार, वाट बघा
तसेच पुढे बोलताना त्यांनी त्यांच्याविरोधातील आरोप तसेच ईडीची चौकशी याविषयीदेखील आपली भूमिका मांडली आहे. “पुरावे न देता फक्त आरोप करायचे. तुम्हाला पुरावे देऊन चौकशी करायला कोणी अडवलं आहे का ? भाजपातल्या नेत्यांची चौकशी होत नाही, जसे की ते स्वच्छ आहेत. हे चुकीचे आहे. माझी सीडी बाहेर येणार आहे. आता सीडी बाहेर काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा.” असे खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय भूकंप होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

हे देखील वाचा :