⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

दुर्दैवी : दोन हरीणांचे आढळले मृतदेह, विहिरीत पडलेल्या हरणाला मिळाले जीवदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवासक्षेत्र ‘मुक्ताई-भवानी’ अभायारण्यातर्गत डोलारखेडा वनपरीमंडळात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन हरीणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर विहिरीत पडलेल्या एका हरीणाला जीव वाचविण्यात वनविभागाला यश आले आहे. दरम्यान, या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे वन्य प्राणी प्रेमीमध्ये नाराजी व्यक्त होत असुन वन्यप्राणी सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवासक्षेत्र ‘मुक्ताई-भवानी’ अभायारण्यातर्गत डोलारखेडा वनपरीमंडळातील वनसीमालगत पुर्णा नदीपात्रात मलकापुर-बऱ्हाणपुर रस्त्याच्या बाजुला कुंड पुलानजिक एका नर जातीच्या हरीणाचा मृतदेह सकाळी ११ वाजता आढळुन आला. तसेच याच परिमंडळातील पिंप्रीपंचम नियतक्षेत्रात असलेल्या नाल्यात एका नर जातीच्या हरीणाचा मृतदेह आढळुन आला. तत्पुर्वी नायगांव फाट्यानजिक असलेल्या शेती शिवारातील विहिरीत हरीण पडले असुन ते अद्याप जिवंत असल्याची माहीती वनविभागाला मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांनी तात्काळ वनविभागाचा फौजफाटा घटनास्थळी रवाना केला.मोठ्या शिताफीने प्रयत्नाअंती विहीरीत पडलेल्या हरणाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.वनविभागाने वेळीच दाखविलेल्या सतर्कतेबाबत वन्यप्रेमीं तसेच स्थानिकांकडुन वनविभागाचे कौतुक होत आहे.

सकाळपासूनच लागोपाठ या घटना उघडकिस आल्या. सकाळी अकराच्या सुमारास ‘जळगांव लाईव्ह’चे मुक्ताईनगर प्रतिनीधी सुभाष धाडे दुचाकीने पेट्रोल पंपावरुन परतत असतांना पुर्णा नदीच्या पुलावरून हरीणाचा मृतदेह दृष्टीत पडल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधुन माहीती कळवली. नेमकं त्याचवेळी कुऱ्हा-काकोडा येथुन मुक्ताईनगरकडे निघालेले वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांना ही बाब समजताच त्यांनी लागलीच वाहन थांबवुन घटनास्थळी स्वत: पाहणी करुन मोबाईलद्वारे कर्मचाऱ्यांना सुचना केल्या तसेच तालुका पशुधनविकास अधिकारी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ डुघ्रेकर यांना मृत हरीणाचे शवविच्छेदन करुन मिळणेसंदर्भात कळविले. संवेदनशील संबंधित माहीती कळविल्याबद्दल तसेच वनसंवर्धन कार्याबाबत वेळोवेळी होत असलेल्या सहकार्याबद्दल ‘जळगांव लाईव्ह’चे प्रतिनीधी सुभाष धाडे यांचे मनापासुन आभार मानुन यापुढेही सहकार्य असु द्या, वनसंवर्धनासाठी लोकसहभाग खुप महत्वाचा असल्याचे ते यावेळी म्हणाले. घटनास्थळी पोहचलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सुचना करुन ते मुक्ताईनगर येथे महत्त्वपुर्ण कामास रवाना झाले.

दरम्यान दोन्ही ठिकाणी घडलेल्या या घटना भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हरीणांच्या कळपाचा पाठलाग करुन हल्ला केल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज समोर येत असुन रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही स्थानिकांच्या निर्दशनास नदीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरीणांच्या कळपाचा पाठलाग काही कुत्रे करत असल्याचे कळते.पिंप्रीपंचम नियतक्षेत्रातील नाल्यावर तसेच दक्षिण डोलारखेडा नियतक्षेत्रातील पुर्णा नदी पुलाजवळ भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असुन वन्यजीवांवर हल्ला चढवुन ठार केले जात आहे.अशीच घटना महीनाभरापुर्वी कोथळी येथील मुक्ताई मंदीर परीसरात घडली होती.या दुर्देवी घटनांमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आला असुन त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.संवेदनशील विषयाबाबत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त अथवा त्यांच्यापासुन वन्यप्राण्यांचे रक्षण कशा पद्धतीने करता येईल? याबाबत प्रयत्न झाले पाहीजेत अशी अपेक्षा स्थानिकांसह वन्यप्रेमींकडुन होत आहे.

दरम्यान दोघंही हरिणांचे मृतदेह पंचनामा करुन डोलारखेडा येथील वनकर्मचारी निवास्थानी आवारात आणण्यात आले.पशुवैद्यकिय अधिकारी डॉ डुघ्रेकर,सहकारी डाॅ चव्हाण,परीचालक सुरवाडे यांनी मृत हरीणांचे शवविच्छेदन केले.वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत संद्याकाळी विधीवत मृत हरीणांचा अंत्यवीधी करण्यात आला.प्रस़गी वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे,वनपाल डि जी पाचपांडे,वनरक्षक दिपाली बेलदार,वनरक्षक विकास पाटील,थोरात,वनमजुर तुकाराम गवळी,अशोक पाटील,योगेश कोळी, सिद्धार्थ थाटे,संजय सांगळकर,वाहन चालक सुरेश महाले,सटीक पिंजारी,महेंद्र पुरकर यांच्यासह डोलारखेडा ग्रामस्थांची उपस्थिती होती.

“मृत हरीणांचा मृत्युचा शवविच्छेदन अहवालानुसार हिस्र प्राण्यांच्या अथवा कुत्र्यांचा हल्ल्यात अॅटक येऊन मृत्यु झाला असल्याचे कळते.वाघ अथवा बिबट्याने हा हल्ला केलेला नाही असे घटस्थळी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर येते.तसेच नायगांव शिवारात विहीरीत पडलेल्या हरीणाला सुखरुपपणे बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले.” – वनपरीक्षेत्र अधिकारी,मुक्ताई-भवानी अभयारण्य