जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ६,०८,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावरील पाटचारीजवळ, हातेड शिवारात संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एका कारमध्ये ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळालीप्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
असा मुद्देमाल जप्त केला?
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ७ किलो ११६ ग्रॅम गांजा (किंमत ₹१,७७,९००), हुंडाई सॅन्ट्रो कार (₹३ लाख), पल्सर मोटारसायकल (₹९० हजार) तसेच विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन (₹४१ हजार) असा एकूण ₹६,०८,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ मधील कलम २०(ब) व २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदेशीर कारवायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









