जळगाव लाईव्ह न्यूज । खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. गाडी क्रमांक ०४१५५/०४१५६ उधना–सुबेदारगंज विशेष रेल्वेचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. आता ही गाडी २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणखी काही काळ या विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे.

गुजरातमधील उधना आणि उत्तर प्रदेशातील सुबेदारगंज यांना जोडणारी ही रेल्वे खान्देशातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरत आहे. या रेल्वेला नंदुरबार, अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ यांसारख्या स्थानकांवर थांबे असल्याने जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील अनेक प्रवाशांना या सेवेचा थेट फायदा मिळतो. मात्र या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा नसल्याने प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी आहे.

उपलब्ध वेळापत्रकानुसार उधना ते सुबेदारगंज प्रवासाचे अंतर सुमारे १,४३७ किलोमीटर असून प्रवासाचा नियोजित कालावधी सुमारे २८ तास ४५ मिनिटांचा आहे. उधना येथून ही विशेष रेल्वे दुपारी ४.१५ वाजता रवाना होते. नंदुरबार येथे सायंकाळी ६.३० वाजता पोहोचल्यानंतर दहा मिनिटांच्या थांब्यानंतर ती पुढे जाते. अमळनेर येथे रात्री ७.५७ वाजता आगमन होऊन दोन मिनिटांनी प्रस्थान होते. त्यानंतर धरणगाव येथे रात्री ८.२५ वाजता गाडी पोहोचते आणि ८.२७ वाजता पुढील प्रवास सुरू करते. भुसावळ स्थानकावर रात्री १०.१५ वाजता आगमन होऊन पाच मिनिटांच्या थांब्यानंतर गाडी सुबेदारगंजच्या दिशेने रवाना होते.
या स्थानकांवर आहेत थांबा?
या गाडीला व्यारा, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर, झाशी, ओरई, पोखरायन, गोविंदपुरी, फतेहपूर या महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहेत






