⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

जामनेर-बोदवड दरम्यान विचित्र अपघात ; शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असून अशातच जामनेर ते बोदवड दरम्यान भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले.

मृतांमध्ये जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (४२, रा.मालदाभाडी, ता.जामनेर), सुनिल शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा समावेश आहे.

नेमकी काय आहे घटना?
जामनेर ते बोदवडच्या दरम्यान असलेल्या वाडीकिल्ला गावाजवळ रात्री ही घटना घडली. यात दोन दुचाकी एकमेकांना धडकल्यानंतर कारने या दोन्ही दुचाकींना उडविले. बोदवडहून जामनेरकडे जाणार्‍या दत्तू रामा माळी आणि सुनील भोई यांच्या दुचाकीचा वाडीकिल्ला येथून मालदाभाडी येथे जाणारे ईश्‍वर त्र्यंबक पारधी यांच्या दुचाकीची टक्कर झाली. यामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर पडले. यातच भरधाव वेगात असलेल्या मागून आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना धडक दिली.

या भीषण अपघातामध्ये दत्तू रामा माळी, सुनील भोई आणि ईश्‍वर त्र्यंकर पारधी यांचा मृत्यू झाला असून कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाला आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.