⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

शहरातील रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, ही कुणाची शेवटची इच्छा असू शकते का? वाचा एका जळगावकराचे पत्र

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ जानेवारी २०२३ | भगवद् गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील २७ व्या श्‍लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की,
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि॥

अर्थात ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू ध्रुव निश्चित आहे आणि जो मरण पावला आहे त्याचा जन्म ध्रुव निश्चित आहे.त्यामुळे जन्म-मृत्यूची ही भावना अपरिहार्य आहे, म्हणजेच तिचा कोणत्याही प्रकारे प्रतिकार करता येत नाही. अगदी भगवान श्रीकृष्णाला देखील मृत्यूचा फेरा चुकवता आला नाही. मृत्यू अटळ असल्याने मृत्यूपूर्वी आपली अखेरची इच्छा पूर्ण व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मृत्यू पुर्वी कुणाला मुला-मुलीचे शिक्षण, लग्न करण्यासह कौंटुबिक जबाबदार्‍या पूर्ण करायच्या असतात. कुणाला संपूर्ण जग पहायचे असते, तर कुणाला स्वत:चे अपूर्ण काम पूर्ण करायचे असते. मात्र मृत्यूपुर्वी एखाद्या व्यक्तीची इच्छा तो राहत असलेल्या शहरातील रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, असू शकते का? या विषयावर चर्चा करण्याचे निमित्त म्हणजे, अस्सल जळगावकर असणारे शहरातील प्रसिध्द आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यापूर्वी त्यांनी तशी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली आहे. वाचा त्यांच्याच शब्दात…

Architect Shirish Barve..
दिनांक
२६.०१.२०२३
प्रिय जळगाव,जळगाव कर…
(कृपया शेवट पर्यंत वाचा)..

As a person and a professional I have always lead a very True,Pure,Honest, Ethical and Spiritual life..

माणसाने कुठेतरी थांबायचे असते.. कोणताच विषय अर्धवट सोडायचा नाही म्हणून हा एक शेवटचा प्रयत्न करून मी थांबणार आहे…

उद्या सकाळी पुण्यात माझ्यावर open heart byepass सर्जरी होत आहे..ती होत असताना चुकून माझा मृत्यू झाल्यास मी माझी शेवटची इच्छा म्हणून हे नोंदवून ठेवत आहे..
..
जळगाव शहराच्या दोन महत्वाच्या समास्यां आहेत…
१) शहरातून जात असलेला अर्धवट सोडून देण्यात आलेला राष्ट्रीय महामार्ग व
२) जळगाव शहराची दयनीय आर्थिक अवस्था !!!…
यावर आपण गेली अनेक वर्ष चर्चा करत आलेलो आहोत.. त्यावर मी माझ्या कुवतीनुसार उत्तर शोधण्याचा तसेच शहराशी संबंधीत सर्व कर्तबगार मान्यवरांपर्यंत हा विषय पोचविण्याचा प्रयत्न देखील केला आहे..
परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीची शक्ती कमी पडली अस वाटतं आहे..

आपली शहरं आपल्या सारखीच जिवंत असतात..शहराला पण भावना असतात…त्यातील रस्ते ह्या शहराच्या arteries, life line असतात..
तरसोद ते पाळधी ह्यामधील शहरातून जाणारा १५ किमीचा राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण ६० मीटर चा भरतो हे वास्तव असताना तो केवळ ४० मीटरच भरतो व त्यावर encroachment आहे असा खोटा रिपोर्ट तयार करून तो शहरा बाहेरून वळवून, शहरातून जाणारा ६० मीटर चा राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण जिवंत(विकसीत) करण्यासाठी लागणाऱ्या रू.४५० कोटी रुपयांची जबाबदारी गरीब जळगाव महानगर पालिकेच्या माथी मारून NHAI ने अनैतिक कृत्य केले आहे..

जळगाव मनपा कडे पुरेशी गंगाजळी नसल्यामुळे व आपण आजही आपल्या मनपा वर असलेल्या कर्जातून बाहेर पडलेलो नसल्याने शहरातील विकासाची कामे थांबल्यामुळे जळगावकर नागरिकांमध्ये कमालीचे नैराश्य आहे..

ह्या दुष्टचक्रातून बाहेर पाडण्याचे दोन अत्यंत सोपे व सहज अंमलात आणता येण्याजोगे मार्ग आहेत…
१) पाळधी तरसोद मधील जळगावात जाणारा राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण विकसीत करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री किशोर राजे निंबाळकर यांच्या कार्यकाळात NHAI चे सल्लागार श्री मालवीया यांनी तयार केलेला सुमारे ४५० कोटी रुपयांचा DPR व २०१४ मधे NGT पुणे बेंच ने दिलेला निर्णय, यामुळे NHAI ला शहरातून जाणारा महामार्ग संपूर्ण Up Grade करून देणे बंधनकारक आहे..
२) जळगाव शहरावर असलेले कर्ज संपून काहीशे कोटी रुपयांची गंगाजळी मनपा च्या खात्यात सदैव राहावी ह्यासाठी शहरातील मनपा च्या मालकीच्या घरकुलांच्या जमिनी, ज्या सुमारे ३५ लाख चौरस फूट आहेत, म्हाडा ने त्यांची Land Bank म्हणून विकत घ्यायच्या. म्हाडा त्यासाठी जळगाव मनपा ला एकरकमी रू.४०० कोटी सहज देऊ शकेल…

जळगाव शहराच्या पुनरुज्जीवनासाठी ह्या समस्या आदरणीय श्री. शरद पवार साहेब,आदरणीय श्री.नितीन गडकरी साहेब,आदरणीय श्री.देवेंद्र जी फडणवीस साहेब चुटकी सरशी सोडवू शकतात..
ह्या तीनही मान्यवरांशी थेट संपर्क,घानिष्टता लाभलेली मान्यवर, कर्तृत्ववान मंडळी आपल्या शहरात अनेक आहेत..त्यांनी वरील दोन्ही समस्यांचे उपाय ह्यापैकी कोणत्याही मोठ्या नेत्यांकडे मांडले तर ह्यांच्या पैकी कोणीही एका फोनवर जळगाव ला समस्यामुक्त करू शकेल इतकी ह्या नेत्यांची ताकद मोठी आहे..
गरज आहे ती आपल्या इच्छा शक्तीची..शहराच्या भल्यासाठी तातडीने सर्व राजकीय मंडळींनी व मान्यवरांनी एकत्र येण्याची गरज आहे ..

उद्या माझा रिझल्ट सुदैवाने चांगला लागला तर माझा जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय, Climate Change, त्याचे दूरगामी परिणाम व जीवन शैलीतील बदलांची आवश्यकता ह्याच्या awareness साठी आयुष्याचा जास्तीत जास्त वेळ देण्याचा संकल्प मी ह्या निमित्त करत आहे…

भवतू सब्ब मंगल..

सबका कल्याण हो..
सबका मंगल हो…

शिरीष बर्वे