जळगाव लाईव्ह न्यूज । देशभरातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ (ONORC) योजनेला अधिक प्रभावी बनवत आता लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही अधिकृत रेशन दुकानातून आपल्या वाट्याचे धान्य घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या नव्या व्यवस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, आता लाभार्थ्यांवर गहू आणि तांदूळ एकाच रेशन दुकानातून घेण्याची कोणतीही सक्ती असणार नाही. जर एखाद्या दुकानात फक्त गहू उपलब्ध असेल आणि दुसऱ्या दुकानात तांदूळ, तर लाभार्थी दोन्ही वेगवेगळ्या दुकानांत जाऊन आपल्या हक्काचा धान्याचा हिस्सा घेऊ शकतील. या सुविधेमुळे धान्याचा तुटवडा, रेशन दुकानांवरील लांबच लांब रांगा आणि बायोमेट्रिक मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे धान्य न मिळण्याचा त्रास आता पूर्णपणे बंद होणार आहे.

या योजनेचा सर्वाधिक लाभ स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडून इतर शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता मूळ गावातील रेशन दुकानावर अवलंबून राहावे लागणार नाही.
केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना देशभरातील रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेमुळे रेशन कार्डधारकांना देशातील कोणत्याही राज्यात किंवा शहरात जाऊन आपल्या वाट्याचे धान्य मिळवणे शक्य होणार आहे.
“ही नवी व्यवस्था अगदी बँकेच्या एटीएम (ATM) सारखीच काम करेल. जसे आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतो, अगदी तसेच लाभार्थी देशातील कोणत्याही अधिकृत रेशन दुकानातून केवळ बायोमेट्रिक पडताळणी करून आपल्या हक्काचे धान्य मिळवू शकतील.”










