जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२६ । आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे, पण १ ऑगस्टपासून अनेक नियम बदलले आहेत. प्रत्येक महिन्याप्रमाणे, १ ऑगस्ट रोजी काही बदल लागू झाले आहेत. हे बदल तुमच्या वैयक्तिक जीवनापासून ते आर्थिक जीवनापर्यंत सर्व गोष्टींशी संबंधित आहेत. यामध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीत कपात, रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली, उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी सक्ती, KYC 2.0 प्रणाली आणि क्रेडिट कार्ड बिलिंग नियमांमध्ये बदल यांचा समावेश आहे.

व्यावसायिक LPG सिलेंडर झाला स्वस्त
तेल कंपन्यांनी १ ऑगस्टपासून व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर कमी केले आहेत. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १९२ रुपयांनी, कोलकातामध्ये २०९ रुपयांनी , मुंबईमध्ये १९४ रुपयांनी आणि चेन्नईमध्ये २०० रुपयांनी किंमत कमी झाली आहे.पण घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

KYC 2.0 प्रणालीची अंमलबजावणी
आजपासून बँकिंग, विमा आणि म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये KYC 2.0 प्रणाली सुरू झाली आहे. या नव्या प्रणालीमुळे सर्व वित्तीय संस्था केंद्रीय डेटाबेसमधून ग्राहकांची पडताळलेली माहिती वापरतील. त्यामुळे सतत KYC करण्याची गरज कमी होणार आहे.
आजपासून ITR दाखल करण्यावर दंड आकारला जाईल
आयकर विभागाने पगारदार वर्गासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै निश्चित केली होती. मात्र, आजपासून या व्यक्तींना आयटीआर दाखल करण्यासाठी दंड भरावा लागेल. हा दंड १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत असेल. या नियमानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना १,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. मात्र, ज्यांचे वार्षिक उत्पन्न या रकमेपेक्षा जास्त आहे, ते ५,००० रुपये भरून आपला आयटीआर दाखल करू शकतील.
क्रेडिट कार्डधारकांना दिलासा
रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड बिलिंग नियमांमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांनी बिलाची संपूर्ण रक्कम वेळेवर भरली नाही, तरी शिल्लक रकमेवर काही दंडात्मक शुल्क आणि कर आकारणीबद्दल दिलासा मिळणार आहे. त्यामुळे व्याजाचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.
RBI बैठकीकडे सर्वांचं लक्ष
याशिवाय ५ ऑगस्ट २०२६ रोजी रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदरांबद्दल निर्णय घेतला जाणार असून, दरवाढ झाल्यावर भविष्यात मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तत्काळ रेल्वे तिकीटासाठी नवीन टोकन प्रणाली
रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू केली आहे. याआधी वेगवेगळ्या काउंटरवर लांबच्या लांब रांगा लागायच्या. आता प्रवाशांना सर्वात आधी टोकन दिले जाईल आणि क्रमांकानुसार तिकीट दिले जाईल. त्यामुळे गर्दी कमी आणि वेळेचीही बचत होईल.
उज्ज्वला योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतगर्तत LPG सबसिडी मिळवणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण केली नाही की, सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात.











