⁠ 
सोमवार, मे 6, 2024

राजू शेट्टी आमदार होणार का ? चाळीसगावात जयंत पाटील म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळण्यात आल्याची चर्चा आहे. यावरून मोठा गोंधळ उडाला असून यावर आज राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथे खुलासा केला.

राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ जणांच्या नावांबाबत राज्यपालांनी आता लवकर निर्णय घ्यायला हवा, अशी आमची मागणी आहे. यापूर्वी जी यादी राज्य सरकारने राज्यपालांना सादर केली आहे, त्यातून कोणाचेही नाव वगळलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना या विषयाबाबत विनंती केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळं राजू शेट्टी यांचं नाव वगळण्यात आलं नसल्याचं पाटील यांनी एकप्रकारे सूचित केलं.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री जयंत पाटील आज शनिवारी चाळीसगावच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत आहे. सत्तेत असलेल्या राज्य सरकारने शिफारस केलेली नावे तपासून त्यावर राज्यपालांनी निर्णय देणे अपेक्षित असते. मात्र, राज्यपाल लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत, असे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटायला लागले आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

देशमुख व खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी
ईडी व सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणणे, त्यांना धमकावणे आणि त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांची बदनामी करण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे. हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे व अनिल देशमुख यांच्यामागे पूर्ण ताकदीनिशी उभी आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.