⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Rahul Gandhi : भारतात रोज होत आहे लोकशाहीची हत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । मी खरं बोलत आहे म्हणून मला त्रास दिला जात आहे. देशात महागाई आणि बेरोजगारी बद्दल कोणीच बोलत नाहीये. मात्र मी खरं बोलतोय म्हणून आमच्या मागे तपास यंत्रणा लावल्या आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले कि, देशातील 70 वर्ष सुरू असलेली लोकशाही या सरकारने 8 वर्षात संपुष्टात आणली आहे. देशात सध्या हुकूमशाही सुरू आहे ती देखील ४ लोकांची. संसदेत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाहीये. महागाई आणि बेरोजगारीवरही बोलू दिलं जात नाहीये असे गांधी म्हणाले.

सर्वाधिक बेरोजगारी भारतात आहे. भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र या गोष्टी अर्थ मंत्र्यांना दिसत नाहीये. कोणत्याही गावात आणि शहरात जा. लोकच तुम्हाला महागाई वाढल्याचं सांगतील. पण सरकारला ही महागाई दिसत नाहीये. सरकार महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहे. हे लोक जनतेच्या शक्तीला घाबरत आहेत. कारण हे लोक खोटारडे आहेत. खोटे बोलत आहेत. देशात महागाई नाही, बेरोजगारी नाही, असं हे लोक खोटं सांगत आहेत. चीनने घुसखोरी केली नाही हे सुद्धा खोटं सांगितलं जात आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

आंदोलनाची परवानगी नाही
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीत कलम 144 लागू केलं आहे. तसेच काँग्रेसला दिल्लीत निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्ही काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना राज्यात कलम 144 लागू करण्यात आल्याने तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसेच तुम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिली जात नाहीये, असंही बजावल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.