जळगाव लाईव्ह न्यूज । अमेरिका आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धामुळे अवघ्या जगाची चिंता वाढली आहे. या युद्धाचा थेट फटका आता जागतिक तेल पुरवठ्याला बसला असून, भारताला ज्याची भीती होती अखेर तेच घडले आहे. इराण आणि अमेरिकेने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गाची नाकेबंदी केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे.

या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणमधील एका कार्यक्रमात देशवासियांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांचे हे आवाहन देशावर घोंघावत असलेल्या मोठ्या ‘तेल संकटाचे’ थेट संकेत मानले जात आहेत. यात पेट्रोल-डिझेलचा जपून वापर करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्या अशी काही महत्वाची आवाहनं पंतप्रधानांनी केली आहेत.

युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमती भडकत चालल्या आहेत. परिणामी परकीय चलन जास्त प्रमाणात खर्च करावं लागत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.
आतापर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे देशात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र, आता तेल कंपन्यांवर प्रचंड ताण पडत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलरवरून थेट १२६ डॉलरवर पोहोचल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना दरमहा तब्बल ३० हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने परवानगी दिल्यास १५ मे पूर्वी देशभरात पेट्रोल आणि डिझेल ४ ते ५ रुपयांनी, तर एलपीजी घरगुती सिलिंडर ४० ते ५० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये बाधित झालेली जल वाहतूक आणि आखाती देशांच्या तेल प्रकल्पांवर इराणने केलेले हल्ले हे तेलाचे दर वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे.











