⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

मंत्री गुलाबराव पाटीलांनी राज ठाकरेंवर सोडला टीकेचा बाण ; म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 जानेवारी 2024 । राजकारण्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, सध्याचे राजकारण असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचे तुकडे होतील असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. यावरून आता राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांच्या विचारांवर महाराष्ट्र चालेल का? असे म्हणत “ज्यांनी आपल्या विचारांना तिलांजली देऊन स्वाभिमान गहाण ठेवला असेल, त्यांना हे लागू होईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्ही पक्षांतर केले म्हणून राज ठाकरे आम्हाला बोलले, असे कुणाला वाटत असेल तर आम्हाला मात्र त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. कारण आम्ही भगव्या झेंड्याच्या विचाराने 35 वर्ष पक्षाचे काम केले. ते विचार आम्ही सोडलेले नाहीत. ज्यांनी हे विचार सोडले त्यांना राज ठाकरे जे बोलले ते लागू होईल”, असे गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?
आपल्याकडील नेते हे पैशांसाठी लाचार आणि मिंधे झाले आहेत. नेत्यांनी त्यांची मने आणि स्वाभिमान गहाण टाकला आहे, कोण नेमके कोणत्या पक्षात आहे हेच समजत नाही, त्यांच्या घरचेही घरी गेल्यावर त्यांना आज कोणत्या पक्षात आहात हे विचारत असतील असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरुन लगावला होता. रायगडमध्ये मनसेच्या सहकार निवासी शिबिरामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते.