⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : ..अखेर वढोदा वनक्षेत्राला मिळाले वनाधिकारी

लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । पट्टेदार वाघांसाठी देशभरात सुप्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील ( वडोदा ) वनक्षेत्रास सुमारे नऊ महिन्यांनंतर कायमस्वरुपी वनपरीक्षेत्र अधिकारी मिळाल्याने स्थानिकांसह वन्यप्रेमीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या वनक्षेत्रात कायमस्वरुपी वनपरीक्षेत्र अधिकारी मिळावा याबाबत ‘जळगांव लाईव्ह न्युज’ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर त्याचे यश मिळाले.

पट्टेदार वाघांचा अधिवास क्षेत्र असलेल्या या भागात आठ ते दहा वाघांचा मुक्त संचार असुन जैवविविधतेसह विविध वनसंपदेसह निरनिराळ्या प्राण्यांचे अस्तित्व या जंगलात आढळते. जंगलाला उत्तरेकडे लागुन असलेली मध्य प्रदेश वनहद्द, पुर्वेस बुलढाणा जिल्हा तसेच दक्षिणेस पुर्णा नदी व पश्चिमेस तापी नदी आहे. पट्टेदार वाघांचा कायमस्वरुपी असलेल्या अधिवासामुळे सदर जंगलाला महत्व प्राप्त झालेले आहे. वनसंवर्धनासह वन्यजीव संवर्धन होणे काळाची गरज असताना, अवैध वनचराई, अतिक्रमण, अवैध वृक्षतोडीसारखे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वनक्षेत्रातील परीपुर्ण पदभारासह सक्षम वनाधिकाऱ्याची गरज या वनक्षेत्रास आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन वनक्षेत्रपाल यांची वन्यजीव पाल येथे बदली झाली. दरम्यान येथील अतिरीक्त प्रभारी पदभार मुक्ताईनगर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल ए आर बच्छाव यांचेकडे देण्यात आला होता. तसेच मध्यंतरी फिरते गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल थोरात यांनीही काही दिवस सदर पदभार सांभाळला होता.येथे कुणीही नवीन अधिकारी रुजु न झाल्याने वन्यप्रेमींमध्ये तसेच स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.परिणामी तब्बल सुमारे नऊ महिन्यांनंतर सदर वनक्षेत्रात (मुख्यपदाधिकारी) वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांनी दि. २५मे रोजी पदभार स्वीकारत सुत्रे हाती घेतले.सचिन ठाकरे यांनी यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध वाघझिरा व्याघ्र प्रकल्पातुन वनपाल पदावरुन पदोन्नती होवुन आले आहे. व्याघ्र प्रकल्पातील एक चांगला दांडगा अनुभव त्यांना असल्याने गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा वन्यप्रेमींतुन व्यक्त होत आहे.

अवैध वनचराई,अतिक्रमण यासारख्या वनापराधांना आवर घालण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.मात्र त्यांनी आल्याआल्याच सांगितले कि,वनक्षेत्रात कोणत्याही स्वरुपाचे अवैध प्रकार खपवले जाणार नाही.वन्यप्रेमी व स्थानिक सुज्ञ लोकांनी सहकार्य करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.लवकरच वनकर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सुचना करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.