⁠ 
सोमवार, मे 6, 2024

हिवरखेडा बु. ग्रामपंचायतीचा दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यशाळेत गौरव ; त्यामागील कारण पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । ‘प्रति थेंब अधिक पिक’ या योजनेतंर्गत कृषि मंत्रालय, नवी दिल्ली येथे 31 मे, 2023 रोजी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. या ग्रामपंचायतीस ठिबक व तुषार सिंचन संचाचा कार्यक्षम वापर केल्यानिमित्त राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या कार्यशाळेस कृषि संचालक, (फलोत्पादन) कृषि आयुक्तालय, म.रा. पुणे डॉ. कैलास मोते, तालुका कृषि अधिकारी, जामनेर अभिमन्यू चोपडे, देविदास दशरथ जोहरे, सरपंच, हिवरखेडा बु. आदि मान्यवर सहभागी झाले होते.

सन 201-16 पूर्वीपासून हिवरखेडा, बु. ता. जामनेर या गावात कोरडवाहू पीक म्हणून कापूस या पीकाची ओळख होती. परंतु “प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक” या योजनेमुळे गावातील शेतक-यांमध्ये कृषि विभागामार्फत मोठया प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केल्याने गावातील 90 टक्क्यांपर्यंत क्षेत्र हे ओलीताखाली आले. गावातील शेतकरी हे आता कापूस पीकाऐवजी केळी पीकाची देखील मोठया प्रमाणात लागवड करीत असल्याने गावातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असून हिवरखेडा बु. ता. जामनेर हे गाव आता केळीचे आगार म्हणुन प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे शेतक-यांचे राहणीमान उंचविण्यास मदत झाली आहे.

ठिबक व तुषार सिंचन संचाच्या वापरामुळे फळपिके/ भाजीपाला व इतर पुरक व्यवसाय जसे-दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन इ. व्यवसायामध्ये देखील वाढ होण्यास मदत झाली आहे. शेतामध्ये मजुरांची समस्या असल्याकारणाने स्वयंचलित सुक्ष्म सिंचन प्रणाली (Automization) चा वापर मोठया प्रमाणात केल्याने या समस्येवरही मात करण्यास मदत झाल्याचे गावातील शेतकरी सांगतात. जळगांव जिल्ह्यातील इतर सर्व शेतक-यांनी “प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक” या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.