जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२१ । सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. “कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे” असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

भालोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण आणि प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाला माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, “स्वर्गीय हरिभाऊ जावळे एक अजातशत्रू नेते होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी आपले राजकीय आयुष्य खर्च केले आहे. विकास कामासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज कोणीही एका पक्षाचा सांगू शकत नाही, सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत, भाजपत तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बाहेरचे लोक आमदार आहेत, आमच्यासारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत. त्यासाठी आपण विनंती करतो की ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा मात्र विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे” असं आवाहन गुलाबरावांनी केलं.












