जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीय. अशातच यावल परिसरात लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यावर एसीबीने कारवाई केली. भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३), वनरक्षक (आगार रक्षक चालक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बोलेरो पिकअप वाहनांच्या माध्यमातून यावल परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. ही वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आणि कोणतीही शासकीय कारवाई न करण्याच्या बदल्यात भैय्यासाहेब गायकवाड यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तक्रारदारांनी २० मार्च २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाच मागणीचे तथ्य समोर आल्यानंतर एसीबीने सापळा रचला. दरम्यान, तडजोडीअंती ९ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी आरोपीने दर्शविली. मात्र पैसे घेण्याच्या वेळी संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. तरीही लाच मागणीचा ठोस पुरावा मिळाल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपीकडून ९,०४० रुपये रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांची पुढील तपासणी सुरू आहे.
या घटनेमुळे वन विभागातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा कारवायांमुळे लाचखोरीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.











