जळगाव लाईव्ह न्यूज | 12 मे 2023 | अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता राज्यातील वातावरण बदललं आहे. अनेक जिल्ह्यांच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांच्या अंगाची काहीलाही होत आहे. पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज असून आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्रात आज उष्ण कोरडं हवामान राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कमाल तापमानात वाढ होईल असंही म्हटलंय. दमट आणि उष्ण हवामानामुळे त्रास होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी रज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. जळगावमध्ये पारा 44.6 अंशावर पोहोचला होता. या वर्षीचे हे राज्यातील सर्वोच्च तापमान ठरलं आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनचं उन्हाचा चटका बसत आहे. दुपारी बारा नंतर तापमानाचा पारा 40 अंशावर जात असल्याने जळगाव चांगलाच हैराण झाला आहे.
दरम्यान, आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मोचा चक्रीवादळामुळे तापमानात मोठे फेरबदल होत असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.












