जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली असून, पिकांना पाण्याची गरज असताना शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशातच हवामान खात्यानं दिलासा देणारा अंदाज वर्तविला आहे. उद्या बुधवारी जिल्ह्यात हवामानात बदल होण्याची शक्यता असून, दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या २४ तासांत जळगावचे किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान विभागाच्या ९ सप्टेंबरच्या नोंदीनुसार, बुधवारी जळगावचे किमान तापमान २३ अंश तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी धुक्यामुळे दृश्यमानता २०० ते ५०० मीटरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. सकाळी धुके आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस, अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे.

विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, तसेच वाहनधारकांनी दृश्यमानता कमी असल्यास वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी बुधवारी होणाऱ्या संभाव्य पावसाच्या अंदाजामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पिकांना पुरेसा पाऊस मिळण्यासाठी पुढील काही दिवसांतील पावसाची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे.






