जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे. स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेस ठाम असून त्यावरून मागे फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी आज कृषी कायद्याविषयीच्या प्रतिचे दहन केले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी खान्देश प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, अतुल लोंढे आ.शिरिष चौधरी माजी खासदार उल्हास पाटील आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपदी रुजू झाल्यापासून स्वबळाचा नारा देत आहेत. आगामी काळातील निवडणुकांवर डोळा ठेवून आम्ही स्वबळाचा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला असून, ते कामाला लागले आहेत. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी असतानाच आम्ही भूमिका मांडली आहे. त्यावर ठाम आहोत. काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात दोन हात करेल,’ असेही पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन एकप्रकारे त्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. त्यावरून महाविकास आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.












