⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा तरुण शेतकऱ्याच्या जीवावर उठला, विजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा एका तरुण शेतकऱ्याच्या जीवावर उठला आहे.जामनेर शहरातील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाला.गोकूळ आनंदा राजपूत (वय २७) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, कुटूंबाचा आधार गेल्याने कुटुंबियांनी आक्रोश केला.

याबाबत असे की, जामनेर शहरातील परेदश पुरा भागामध्ये गोकुळ राजपूत हा आपल्या आई-वडील, पत्नी व भाऊ, कुटुंबियांसोबत राहतो. गोकूळ राजपूत याच्या सहा एकर शेतात मका व हरभरा पेरलेला आहे. शेतीचा विजपुरवठा रात्री ११ वाजता सुरू होत असल्याने गोकूळ राजपूत नेहमीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेला होता. विजपंप सुरू करतांना त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.

सोमवारी सकाळी तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध घेतला. त्यावेळी विजपंपाच्या पेटीजवळ तो पडलेला आढळला. पेटीतच वीजप्रवाह उतरल्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रूग्णालयात आणला.

अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन आलो. नियमानुसार वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. चुक नेमकी कुणाची, कनेक्शन अधिकृत आहे किंवा नाही, या बाबी पडताळून पाहण्यासाठी शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या त्रयस्थ अभियंत्याकडून स्थळ निरिक्षण होईल. त्याबाबतच्या सर्व बाजू पळताळून पाहिल्यानंतर अहवाल विजवितरण कंपनीकडे जाईल. त्यानंतर मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे जामनेरचे उपकार्यकारी अभियंता एस.एच.बागरे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :