⁠ 
बुधवार, मे 1, 2024

बुद्ध पौर्णिमेदिवशीच प्राण्यांची गणना का केली जाते; जाणून घ्या सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ मे २०२३ | बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंतीचा दिवस. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देशभरातील अभयारण्यांमधील प्राण्यांची गणना केली जाते. वन खात्यातील सरकारी कर्मचारी यांच्यासह वन्यजीव प्रेमींसाठी हा दिवस मोठा कुतूहलाचा असतो. मचाणवर बसून त्यांना जंगलातील प्राणी पाहण्याची संधी मिळते. आज जळगाव जिल्ह्यातील अभयारण्यातील १८ पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यासह मचाण उभारण्यात आले आहेत. गतवर्षी झालेल्या प्राणी गणनेत अभयारण्यात ७ बिबट्यासंह तब्बल ३३२ प्राणी आढळून आले होते. यामुळे या वर्षीही प्राणी गणनेचा उत्साह वन्यजीव प्रेमींमध्ये दिसून येत आहे. मात्र बुद्ध पौर्णिमेदिवशीच प्राण्यांची गणना का केली जाते, हे तुम्हाला माहित आहे का?

वन्यजीवांच्या नोंदी घेण्यासाठी जिल्ह्यातील अभयारण्यातील १८ पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यासह मचाण उभारण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी ४ ते दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी ८ या कालावधीत प्रत्यक्ष वन्यप्राणी निरीक्षण करून नोंदी घेतल्या जाणार आहेत. या काळात पर्यटकांसाठी अभयारण्य बंद राहणार आहे. ६ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेले गौताळा औट्रमघाट अभयारण्य राज्यातील मोठे अभयारण्य मानले जाते. या अभयारण्यात ४२ किमी लांबीचे सह्याद्रीचे पठार असून ८०० ते २००० हेक्टरचे पाटणा, ओढरे, बोढरे, जुनोने असे चार वनकक्ष, सोबत पाटणा तसेच बोढरा हे दोन वनपरीमंडळ आहेत.

वन्यजीव विभागाकडून तेथे तयार करण्यात आलेले ३० नैसर्गिक व २० कृत्रिम असे एकूण ५० पाणवठे आहेत. पाणस्थळांवर निरीक्षण अभयारण्यातील जुनोने तलाव, पाटणा, बोढरे व ओढरे बिट परिसरात एकूण पाच कृत्रिम पाणस्थळांवर ट्रॅप कॅमेेरे लावून, तसेच जुनोने बिट भागात ४ ठिकाणी, बोढरे परिसरात ३, पाटणा येथे ४ व ओढरे येथे २ व इतर ५ अशा एकूण१८ ठिकाणांवर मचाण उभारून प्रत्यक्ष निरीक्षण करून प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत.

या कारणामुळे बुद्ध पौर्णिमेदिवशीच प्राण्यांची गणना केली जाते
वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळ्या तीव्र असतात. त्यामुळे पाणवठ्यावर हमखास ते येतात. २४ तासामध्ये त्यांची गणना केली जाते. वनखाते अधिकारी दुपार पासूनच मचाणीवर बसतात. रात्री किमान एकदा प्राणी पाणवठ्यावर येतात. मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर कोणता परिणामा झाला आहे का? कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या दिवशी वन्यप्राण्यांची गणना केली जाते. बुद्ध पौर्णिमा मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात येत असल्याने जंगलातील झाडांची पाने गळून गेलेली असतात. त्यामुळे लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून दिसतात.