जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । नोव्हेंबर महिन्याच्या शेवटची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हिरावला आहे. आता राज्यावरील अवकाळीचे संकट कधी दूर होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु अशातच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट
आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 3 दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात कमाल तापमान २४ अंशापर्यंत आहे. तर किमान तापमान १९ अंशापर्यंत राहिले. ढगाळ हवामान असल्याने जळगावकरांना थंडी जाणवत आहे.










