⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Tiger in Farm : शेत नांगरताना समोर आला वाघ आणि मग…

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी परीसरातील केळी बागेत मागील आठवड्यात एक पट्टेदार वाघ विश्रांती घेत असलेल्या अवस्थेत आढळुन आला होता. वाघाची मजेदार छबी नागरीकांनी मोबाईल मध्ये शुट केल्याची घटना ताजी असतानाच येथील शेतकरी वैभव पाटील ७रोजी शेत नांगरताना शेतकऱ्यांना रात्री दहाच्या सुमारास ट्रॅक्टरच्या लाईटच्या प्रकाशात समोर बांधावर पट्टेदार वाघ समोरासमोर दिसून आला. स्वत:जवळच्या मोबाईल मध्ये पाटील यांनी समोरचा देखावा कैद केला. तीन दिवसांपूर्वी शेजारच्या केळीबागेत वाघाने रानडुकराची शिकार केली होती. तसेच गुराख्यासह आणखी दोघांनाच्याही नजरेत वाघ दिसुन आला. यामुळे याच परीसरात वाघाचा मुक्त संचार असल्याचे सिद्ध होत असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडुन एक प्रशिक्षित टिम नेमुण गस्त घालावी तसेच संवेदनशील भागातील केळीबागेत शेती कामे करताना शेतकऱ्यांना सहकार्य करावे. अशी मागणीवजा अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी वर्गाची आहे. मात्र वनविभागाच्या वरीष्ठ पातळीवरुन सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

देशभरातुन पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या जळगांव जिल्ह्यातील (वडोदा वनक्षेत्र) आई मुक्ताई-भवानी व्याघ्र अधिवास क्षेत्र. या क्षेत्रात आठ-दहा वाघांचा असलेला मुक्त संचार असल्याने जिल्ह्याच्या वैभवात भर पडली. हि जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र आजपर्यत या अधिवास क्षेत्राचा अपेक्षित विकास हवा तितका झाला नाही. गेल्या सात महिन्यांपासून वैभवशाली वनक्षेत्र प्रभारी कार्यभारावर तग धरुन आहे.एक अनुभवी कर्तव्यदक्ष अधिकारी यांची नेमणुक सुध्दा वनविभागाकडुन होत नसेल तर इतर व्याघ्रसंवर्धनाविषयी वनविभाग कोसो दुर आहे.या संवेदनशील वनक्षेत्राबाबत काही महिन्यांपूर्वी मंत्रीमंडळाची एक महत्त्वपुर्ण बैठक ही पार पडली. मात्र, विकासाबाबत पुढे काय झाले माहीती नाही. तसेच राजकिय कारकिर्दीत वजनदार मंत्रीपदे लाभलेल्या वाघांच्या जिल्ह्यात वाघ उपेक्षित असून जंगलात पायाभुत सुविधा नसल्याने शेतीशिवारात भटकावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दिवसोंदिवस जमिनीतील पाणी उपस्याचे प्रमाण वाढल्याने जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत ऐन उन्हाळ्यात आटुध कोरडेठाक होताहेत. जंगलातील उन्हाळ्यात असलेला नैसर्गिक थंडावा नामशेष होत असुन उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी मासभक्षी प्राणी केळीबागेत आसरा शोधत भटकत आहे.अवैध वनचराईमुळे तृणभक्षक वन्यप्राणी अन्नपाण्याच्या शोधात शेतीशिवाराची वाट धरताहेत. यास कारणीभुत वाघांचा मुक्त संचार असलेल्या संवेदनशील जंगलात ठोस उपाययोजना नियोजनबध्द व प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाही.आवश्यक तेवढा विकास करण्यास वनविभाग अपयशी ठरला. तसेच परीसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याने आज जिल्ह्याच्या वैभवात मानाचा तुरा रोवुन जिल्ह्याचे नाव देशपातळीवर नेणाऱ्या पट्टेदार वाघ वणवण भटकताहेत हे दुर्दैव. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या सरंक्षणाचा प्रश्न उपस्थित होत आहे. वाघाच्या मुक्त संचारामुळे या भागात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय होऊ शकते. अशा शंकाही काही जाणकरांकडुन व्यक्त होत आहे. याबाबत वनविभागाने अधिक कार्यक्षम राहण्याची गरज आहे.