⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तीन वर्षांपासून बंद रस्ताने अखेर घेतला मोकळा श्वास

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील कोळी वाड्यालगतच्या असलेल्या व गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला. या रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे व गवत जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली असून लवकरच त्यावर मुरूम टाकण्यात येणार आहे.
सुकळी येथे महामार्गाला लागुनच कोळी वाड्यालगत असलेला एक प्रमुख रस्ता ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे बंद झाला होता. रस्त्यावर काटेरी बाभळीची झाडे-झुडपे व गवत वाढलेले होते. शिवाय सांडपाणी अस्तावस्त पसरून याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. अंगणवाडी व मराठी शाळेत ये-जा करण्यासाठी तसेच कोळी वाड्यातील ग्रामस्थांना व शेतमजुरांना हा रस्ता वापरण्यास सुलभ होता, परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अवजड वाहनांची रहदारी असलेल्या महामार्गावरुन धोकेदायक वापर करावा लागत होता. सुमारे तीन वर्षापासुन रस्ता बंदावस्थेत असल्याने नागरीकांना अडचणी निर्माण झालेल्या होत्या. कोळी वाड्यातील नागरीकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. मात्र याबाबत दखल घेतली गेली नव्हती.

उपसरपंच नमायते यांनी घेतली दखल
दरम्यान, सुकळीचे उपसरपंच नंदु नमायते यांनी या विषयाची दखल घेत दि. २५ रोजी जेसीबी मशीनच्या साहाय्याने काटेरी झुडपे काढली व लवकरच सांडपाण्याच्या नाल्या तयार करुन मुरुम टाकला जाईल असे ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. रस्ता मोकळा झाल्यामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.