⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

…तर ‘त्या’ ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा भाजपवर जोरदार प्रहार

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने  आक्रमक भूमिका घेत आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं आहे. दरम्यान, या आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.

ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, असा सवाल रोहिणी खडसे यांनी भाजपला विचारला आहे. रोहिणी खडसे यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.

इतकंच नाही तर रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. “आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते” असं रोहिणी खडसेंनी ट्विट केलं आहे.

जळगावातील आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदार भाजपने ओबीसी चेहरा म्हणून खासदार रक्षा खडसे यांच्याकडे दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आंदोलन होत आहे.  रक्षा खडसे यांनी प्रथमच आपल्या नणंद रोहिणी खडसे यांना कडक राजकीय उत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात खडसे विरूद्ध खडसे हा सामना होणार मात्र यातून अँड. रोहिणी खडसे व रक्षा खडसे यांचे नवे नेतृत्व पुढे येणार काय हे काळच ठरवेल.