⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

भाजप नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर आ.महाजनांचे मौन

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त भागाची आज शनिवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. दरम्यान, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपच्या आजी माजी ६ नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर गिरीश महाजनांना विचारले असता त्यांनी या विषयाला बगल देत मौन बाळगले. या विषयावर त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

मात्र, आ. महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले. म्हणूनच हे आरक्षण नाकारण्यात आले. हे सरकार तीन पक्षांचे असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये मतभेद आहेत. मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

आ.महाजन पुढे म्हणाले की, राज्यात आमचे सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण असे आरक्षण देण्यात आले होते. आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती. त्यानंतरच आरक्षण दिले गेले होते. तेव्हा उच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. मात्र, सरकारने योग्य बाजू मांडल्याने ते आरक्षण टिकले होते. दुर्दैवाने आमचे सरकार गेले.

त्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही. म्हणून आरक्षण गेले. आरक्षण नाकारण्यात आले, त्याला भाजप सरकार जबाबदार नाही. महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले. म्हणूनच हे आरक्षण नाकारण्यात आले. हे सरकार तीन पक्षांचे असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये मतभेद आहेत. मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.