⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

शेळगाव – बामणोद व कडगाव-जोगलखेडा पुल ठरणार विकासाचे मॉडेल : पालकमंत्री

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । आपण पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवले आहे. यानुसार शेळगाव ते बामणोद आणि कडगाव ते जोगलखेडा या दोन्ही पुलांचे भूमिपुजन होत असून हे दोन्ही पुल विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाणार आहेत. या पुलांमुळे आरपट्टी आणि पारपट्टीचे खर्‍या अर्थाने मनोमीलन होणार असून यावलहून जळगावकडे येणार्‍यांचा सुमारे २० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. यामुळे परिसरातील विकासाला प्रगतीचे पंख लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

४४ कोटी रूपयांच्या शेळगाव ते बामणोद या पुलाचे शेळगाव येथे तर २१ कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या कडगाव ते जोगलखेडा या पुलाचे कडगाव येथे भूमिपुजन झाल्यानंतर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, हे दोन्ही पुल एक वर्षात पूर्ण होणार असून याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधीत खात्याला निर्देश देण्यात आले आहेत. तर, या कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांनी पालकमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

शेळगाव ते बामणोद या तापी नदीवरील तर कडगाव ते जोगलखेडा या दरम्यान वाघूर नदीवरील पुलांचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

असे असणार पूल
यातील शेळगाव ते टाकरखेडा (बामणोद) या दरम्यान, तापी नदीवर उभारण्यात येणार्‍या पुलासाठी तब्बल ४४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा पूल ४२० मीटर लांबीचा असून याची रूंदी १२ मीटर इतकी असेल. याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दीड किलोमीटर असा तीन किलोमीटरचा पोच रस्ता प्रदान करण्यात आला आहे. तसेच, वाघूर नदीवरील कडगाव आणि जोगलखेडा या दोन गावांना जोडणार्‍या पुलासाठी २१ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून हा पुल ३९० मीटर लांब आणि सव्वा नऊ मीटर रूंद इतका आहे. यात देखील दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दीड किलोमीटर असा तीन किलोमीटरचा पोच रस्ता प्रदान करण्यात आला असल्याची माहिती अधिक्षक अभियंता यशवंतराव भदाणे यांनी दिली. हा पूल अतिशय अद्ययावत अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

तडफदार, दिलदार व उदार व्यक्तीमत्व म्हणजेच गुलाबभाऊ : आ. शिरीष चौधरी
यावल-रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्र्यांचे अगदी तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले की, शेळगाव – बामणोद ते टाकरखेडा या पुलामुळे आमच्या मतदारसंघाची जळगाव सोबतची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. या कामाला निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागत असून या माध्यमातून “राजा उदार झाला.. . .आणि रांजण पाण्याने भरला” असे म्हणावे लागेल. भाऊ हे तडफदार, दिलदार आणि उदार असून अशा पालकमंत्र्यांचा आपल्याला अभिमान वाटतो असे कौतुकोदगार आ. शिरीष चौधरी यांनी काढले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्यांना हात घातला. ते म्हणाले की, शेळगाव ते टाकरखेडा आणि कडगाव ते जोगलखेडा या दोन्ही पुलांमुळे मने जोडली जाणार आहेत. या परिसरातील शेतकरी हे अतिशय मेहनती असून आता शेळगाव बंधारा पूर्णत्वाकडे आल्यामुळे या भागात सुबत्ता येणार असून याचा इतर भागांशी संबंध देखील सुकर होणार आहे. आपण जळगाव ग्रामीणचे आमदार असलो तरी पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यात विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतो. शेतकरी हा आमच्या वाटचालीचा केंद्रबिंदू असून जिल्ह्यात मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतून ५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

हे देखील वाचा :