⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयावर एकनाथराव खडसेंनी सांगितला भाजपमधला अनुभव

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । राज्यात शिंदे-भाजप सरकारने सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड थेट लोकांमधून करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी जोरदार टीका केलीय. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मोठा खुलासा केला आहे. लोकांमधून सरपंच निवडणे हे अत्यंच चुकीचे आहे. भाजपमध्ये असतानाच आम्ही या अडचणीला सामोरं गेलो होतो, असा खुलासाच खडसे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरपंच आणि नगराध्यक्ष लोकांमधून न निवडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-भाजप सरकारने सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड थेट लोकांमधून करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये असताना या निर्णयाचा कसा परिणाम झाला, हे जाहीरपणे बोलून दाखवलं आहे.

‘हा निर्णय काही योग्य नाही. मी अनुभवलेला आहे. लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे हे चुकीचे आहे. याआधीही मी भाजपमध्ये असताना नगराध्यक्ष निवडणुकीत आमचा उमेदवार निवडून आणला होता. अगदी 2020 साली जळगाव महापालिकेमध्ये भाजपचा लोकनियुक्त सरपंच आम्ही निवडून आणला होता. त्यावेळी पाच वर्ष हा काय काळ होता तो विचित्र गेला होता. त्यावेळी इतर सदस्य हे वेगळा निर्णय घ्यायचे आणि नगराध्यक्ष हा वेगळा निर्णय घ्यायचा. नगराध्यक्ष वेगळा निर्णय घ्यायचा तर त्याला सदस्य विरोध करायचे, असं खडसेंनी साांगितलं.

‘मुक्ताईनगरमध्ये आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष होता, तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण पक्ष बदलला आणि काही लोक दुसऱ्या पक्षात गेले. त्यामुळे आमची काही लोक आणि विरोधक अशी भूमिका झाली. त्यामुळे प्रशासनात निर्णय घेण्यास अडचणी निर्माण झाल्यात, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

सरपंच निवडणूकही अशी झाली तर सदस्य आणि त्यांच्यात वाद निर्माण होतो. सरपंच हा काहीच कामाचा नसतो. त्याला कोणतेही अधिकारी राहत नाही. त्यामुळे हा निर्णय घेणे चुकीचे आहे. एकतर नगराध्यक्षाला आणि सरपंचाला अधिकार दिले पाहिजे. काही विशेष अधिकार असले तरच तो काम करू शकतो. पण अधिकारच नसले तर बहुमतावरच त्याला अवलंबवून राहावे लागते, यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होते. यापेक्षा पूर्वीची जी पद्धत होती, ती योग्य होती, असंही खडसेंनी सांगितलं.