जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२५ । राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरु केली असून अर्थात निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानी भरपाई म्हणून पिकांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. मात्र खरीप हंगामात पीक विमा उतरविला असतानाही अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांच्या विम्याचा लाभ आठ महिन्यांपासून मिळालेला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लोकशाही दिंडी काढत तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

खरीप हंगामात पीक विमा उतरविला असताना पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होती. परंतु अमळनेर तालुक्यातील १६ गावांतील शेतकऱ्यांना अद्याप खरीप पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मका आदी पिकांचा समावेश होता. अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून खरीप पिकांची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि काढणीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडे मागणी केली होती.
तहसीलवर मोर्चा काढत दिले निवेदन
दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याची रक्कम १६ गावांतील शेतकऱ्यांना आठ महिन्यांपासून मिळालेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लोकशाही दिंडी काढत तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.