जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२६ । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने अधिकृतपणे माघार घेतल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने माघारीची विनंती होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले. गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या Ajit Pawar गटाने भाजपसोबत युती केल्यावरही टीका केली.

सपकाळ यांनी सांगितले की, आज सकाळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांची भेट घेऊन काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती केली होती. त्याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील काँग्रेसने माघार घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
दरम्यान, स्वतः उमेदवारसुनेत्रा पवार यांनीही फोन करून माघार घेण्याची विनंती केल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. तसेच त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतल्याचेही सांगितले. या निर्णयामुळे बारामती पोटनिवडणुकीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.











