⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

टरबुजासाठी घेतले कर्ज, भाव न मिळाल्याने निघाले दिवाळे आणि मग शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले टाकळीच्या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । टरबुजाचे भाव काेसळल्याने झालेले नुकसान आणि त्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवंचनेत असलेल्या टाकळी प्रदे येथील ४० वर्षीय तरूण शेतकऱ्याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. योगेश दिलीप पवार ( वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना २७ रोजी सकाळी ८. ३० वाजता सायगाव येथील मन्याड डॅम जवळील आंबा फाटा येथे घडली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

याेगेश पवार यांची टाकळी शिवारात ३ एकर शेती आहे. त्यांनी ३ एकर व शेजारचे दाेन एकर अशा ५ एकर क्षेत्रावर टरबूज लागवड केली हाेती. यासाठी त्यांनी ६ ते ७ लाख रूपये कर्ज घेतले ते टरबूज पिकासाठी खर्च केले. परंतु उत्पन्न निघाले तेव्हा बाजारात टरबुजाचे भाव घसरले. टरबूजाला २ ते ३ रूपये किलाेने भाव मिळाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतुन त्यांनी आत्महत्या केली असे येथील नागरीकांनी सांगितले. या प्रकरणी स्वप्नील डिगंबर पवार यांच्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.