जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) ३१ जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांसह शेतकऱ्यांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली हवामान प्रणाली आणि राज्यात सक्रिय असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, तसेच ताशी वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, त्यामुळे खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस लाभदायक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लघु व मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.










