⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | महाराष्ट्र | राजकीय भूकंप : अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा!

राजकीय भूकंप : अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : १८ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार, या चर्चेने सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. दिवसभर उलटसुलट चर्चा सुरु असतांना पडद्यामागे अनेक घडामोडी घडत होत्या. आता मंगळवारी पुन्हा एकदा याच चर्चेने जोर धरला आहे. कारण अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे देखील नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हे पाऊल अजित पवार उचलतील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल.

अजित पवारांच्या भुमिकेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. २०१९ रोजी अजित पवारांनी पहाटे राजभवनभर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हाही असे काही घडेल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना वाटले नव्हते. तसेच यापूर्वी त्यांनी अचानक अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य असावे, असा संशय राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांमध्ये आहे.

या सगळ्या घडामोडींवर आणि अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एवढंच नाही तर शरद पवार यांनी जेव्हा अदाणींच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्यानंतर दुसर्‍याच दिवशी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. आता ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजितदादांकडे आहे हे वृत्त समोर आल्यानंतरही शरद पवार यांनी या सगळ्याबाबत सूचक मौन बाळगलं आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरुय : पृथ्वीराज चव्हाण

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.