जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२५ । नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एक मोठा गिफ्ट दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नव्या वर्षाच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी देण्याचा समावेश आहे.

खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी जाहीर
आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतींमुळे शेतकऱ्यांना होणारी परतवाळणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ५० किलोच्या डीएपीच्या बॅगेवर अतिरिक्त सबसिडी जाहीर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ही खताची बॅग यापुढेही १३५० रुपयांना मिळत राहील. यासाठी ३८५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या दिलासा मिळेल.

सोबतच पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारीत पीक विमा योजना ह्या महत्वाच्या योजनांना २०२५-२६ पर्यंत सुरु ठेवण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या योजनांसाठी ६९५१५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतील पंचनामे, विमा परतावा आदी बाबींसाठी ८०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेणे सुलभ होईल.












