⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी तसेच तळवेल गावातील मूळ रहिवासी असलेल्या 40 वर्षीय युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-नागपूर महामार्गावरील हिरा मारोती मंदिराजवळ गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. मिलिंद भागवत राणे (40, तळवेल) असे मयत युवकाचे नाव आहे.

अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
मिलिंद राणे हा युवक बुधवारी दुपारी काम आटोपून भुसावळ येथून दुचाकीने (क्रमांक एम.एच.19 सी.7171) ने घराकडे येत असताना दीपनगर जवळील कपिल वस्तीलगत अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने मिलिंदच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. मयत तरुणाच्या पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. अपघात प्रकरणी विलास जनार्दन राणे (58, तळवेल) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक परशुराम दळवी, हवालदार मुकेश जाधव करीत आहे.