जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथील ४० वर्षीय महिलेवर तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त झाली आहे. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या संयुक्त उपचाराला यश आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सतत पोटदुखी व पोट फुगण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला सामान्य आजार समजून उपचार घेतल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात स्त्रीरोग विभाग प्रमुक डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मृदुला मुंगसे आणि डॉ. प्राजक्ता पाटील यांनी महिलेची सीटी स्कॅन तपासणी केली. या अत्याधुनिक तपासणीत महिलेला ओव्हेरियन (अंडाशयाचा) कॅन्सर असल्याचे निदान झाले.

त्यानंतर रुग्णाची प्रकृती आणि आजाराची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल भारंबे यांना पाचारण करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त पथकाने रुग्णावर सायटोरिडक्शन सर्जरी आणि डि-बल्कींग सर्जरी या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जवळपास पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत अंडाशयाजवळील दोन मोठ्या कॅन्सरच्या गाठी यशस्वीरित्या काढण्यात आल्या.
या उपचारामुळे महिलेला नवजीवन मिळाले असून सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. तसेच शरीरातील कॅन्सरग्रस्त ऊती शक्य तितक्या प्रमाणात काढून टाकण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे, अत्यंत खर्चिक समजली जाणारी ही शस्त्रक्रिया शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. तेजस सोनवणे, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ.ऋचा गौर, डॉ. चंदन महाजन, डॉ. प्रचिती पथरदे,भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे, डॉ. महाजन यांनी सहकार्य केले.
ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य पोटदुखी, पोट फुगणे किंवा भूक कमी लागणे अशी असल्यामुळे महिलांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही लक्षणे सातत्याने जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णाला चांगले आयुष्य मिळू शकते.
- डॉ. अतुल भारंबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. उल्हास पाटील रूग्णालय









