आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय

जुलै 28, 2026 2:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य मंत्रिमंडळाची आज (२८ जुलै) महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ८ मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कृषी विभाग, विधि व न्याय विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास व पंचायती राज विभाग आणि नगर विकास विभागाअंतर्गत अनेक महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यानी घेतले. याचा कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार ते आपण जाणून घेणार आहोत….

mantralay fadanvis

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय ?

१) मादक द्रव्ये व मादक पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत दाखल प्रकरणे चालविण्याकरीता पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. विधि व न्याय विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

२) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्याकरिता अध्यादेश काढण्यात आला. ग्राम विकास व पंचायती राज विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

३) महाअॅग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅग्रिटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील व्यवस्थापकीय संचालक पदाला मान्यता देण्यात आली. कृषी विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

४) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८ (७) सुधारणा. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी स्वामित्वधनाच्या दहापट दंड ठोठावण्यात येणार. महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

५) अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. विधि व न्याय विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

६) सोलापुरातील कुर्डुवाडी येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. विधि व न्याय विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

७) अनुसुचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९, सुधारीत अधिनियम, २०१५ अनुसार दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड व यवतमाळ येथे अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्यास मान्यता. विधि व न्याय विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

८) मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात येणार आहे. कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातही २५ कोटी वरुन २२५ कोटी रुपये वाढवणार आहेत. नगर विकास विभाग-१ विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now