जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी आणि बाजारातील साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवीन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ‘अत्यावश्यक वस्तू कायद्या’अंतर्गत हे आदेश जारी केले असून, हे नवे नियम येत्या १ ऑगस्टपासून ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत देशभरात लागू राहणार आहेत.

नव्या नियमांनुसार, कोणत्याही व्यापाऱ्याला ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी किंवा एकावेळी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही. याशिवाय, सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या ताब्यातील साखरेच्या साठ्याची माहिती ऑनलाइन पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारकडून या माहितीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या मते, सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढते. अशा वेळी कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ होऊ नये, तसेच ग्राहकांना योग्य दरात साखर उपलब्ध व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या नियमांमुळे साखरेचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल, तसेच बाजारातील अनावश्यक साठेबाजी आणि दरवाढीवरही नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.












