⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

वाळू चोरीस केला विरोध म्हणून शेतकऱ्याचा केला खून

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२३ । अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वाळूची अवैधरीत्या चोरटी वाहतूक करण्यास विरोध केल्यानंतर जयवंत यशवंत कोळी (35) या तरुण शेतकर्‍याचा सात जणांच्या जमावाने ट्रॅक्टरखाली चेंगरून व गुप्तांगावर फावड्याने वार करून खून केला होता. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दोन महिन्यांपासून पसार असलेल्या मुख्य संशयीताला मारवड पोलिसांनी रविवार, 5 रोजी अटक केली आहे.

वाळू वाहतुकीस जयवंत कोळी या तरुण शेतकर्‍याने विरोध केल्यानंतर सात जणांनी ट्रॅक्टर खाली चेंगरून व पावडीने गुप्तांगावर वार करुन त्याचा निर्घृण खून केल्याची घटना 16 जानेवारी रोजी रात्री घडली होती. यातील मुख्य संशयित अशोक लखा कोळी (52) या पसार होता. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना संशयित शिंदखेडा येथे येत कळाल्यानंतर डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, पीएसआय विनोद पाटील यांनी हवालदार संजय पाटील, सुनील आगोने, पोलिस नाईक सुनील तेली, अनिल राठोड, उज्ज्वल पाटील, तुषार वाघ, दिनेश पाटील यांच्या पथकाने रविवारी शिंदखेडयाबाहेर त्यास अटक केली. त्यानंतर त्यास मारवड पोलिस ठाण्यात आणले. खून प्रकरणात यापूर्वीच सहा संशयीतांना मारवड पोलिसांनी अटक केली आहे.