जळगाव लाईव्ह न्यूज | १ एप्रिल २०२३ | छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या हिंसाचारावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापतेल पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान केले होते. यावेळी पवार म्हणाले होते कि, राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता आता चिंता वाटायला लागली आहे. पवारांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले होते कि, अलिकडच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात जो काही प्रकार घडला आणि इतरही काही ठिकाणी असे प्रकार घडले. या प्रकारांना धार्मिक संदर्भ आहेत की काय? अशी चिंता वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर उत्तर देताना मंत्री नारायण राणे म्हणाले कि, बोलताना संयम असायला हवा. कुणाचेही मन दुखतील असं बोलायला नको. मात्र शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. कारण त्यांचं सरकार आता सत्तेत राहिलेलं नाही. मात्र, त्यांच्या महाविकास आघाडी सरकारनेच लोकांना जास्त चिंतेत टाकलं होतं. त्या काळात लोकं चिंताग्रस्त होती. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता.
तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते अशी टीका करतानाच शरद पवार यांना अभिप्रेत असा राज्य कारभार लवकरच दिसेल असेही राणे यावेळी म्हणाले.
नारायण राणे यांच्या हस्ते कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सिंधदुर्ग भवन येथील आंबा महोत्सव 2023 चं उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.