जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । तुम्ही जर पुढच्या दोन चार दिवसात रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. कारण भुसावळ (Bhusawal Railway Station) विभागातील पाचोरा रेल्वे स्थानकावर (Pachora Station) रिमाॅडलिंगची कामे केली जाणार आहेत. यामुळे काही रद्द करण्यात आल्या आहे. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी गाड्यांची स्थिती पाहूनच जा, अन्यथा गैरसोय होईल.

पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमाॅडलिंगच्या कामामुळे भुसावळ विभागातून मुंबई (Mumbai), पुण्याकडे जाणाऱ्या ४ रेल्वे गाड्या येत्या शनिवारी व रविवारी (१३ व १४ ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या. तर अप मार्गावरील ८ व डाऊन मार्गावरील ८ गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. म्हणजेच या गाड्या विलंबाने धावतील. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्तहिक गाड्यांचा समावेश आहे.

डाउनच्या ४ गाड्यांना थांबा
रविवार व सोमवार दोन दिवस मुंबईकडून भुसावळकडे येणाऱ्या (डाउन मार्ग) चार गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यात १२६२७ बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस १.१० तास, ११०५५ एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस १.१० मिनिटे, १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २० मिनटे, ११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेस २० मिनिटे थांबवण्यात येईल. दरम्यान, अप मार्गावर आठ रेल्वेगाड्यांना थांबा दिला जाणार आहे.
रद्द गाड्या अशा : तिकिटांचा परतावा मिळेल
१२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी १४ ऑगस्टला अमरावती, तर १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १५ ऑगस्टला मुंबई येथून सुटणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १३ला नागपूर, तर १२१३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ला पुणे येथून सुटणार नाही. १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू १४ व १५ रोजी भुसावळ, तर इगतपुरी-भुसावळ मेमू १५ व १६ आणि १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्ट, तर १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ला रद्द केली आहे.











