जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या एका मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या महिलेस तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मात्र, डॉक्टरांनी शवविच्छेदन न करताच मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. हे प्रकरण तापू नये म्हणून हा गैरमार्ग तेथे उपस्थित डॉक्टरांनी निवडल्याने अखेर वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दोन वेळा या विभागाच्या बैठका घेऊन झाडा झडती केली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे हे या विभागाचे प्रमुख आहेत.

ऐश्वर्या अविनाश अडकमोल (वय २५, रा.कोरपवली ता.यावल) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने ७ जून रोजी मुलीस जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर प्रकृती खालावताच तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तेव्हा तेथे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हते. काही शिकाऊ डॉक्टर, नर्स यांनी उपचार सुरु केले. कुटुंबीयांनी याचवेळी आक्षेप घेऊन डॉक्टरांना बोलावण्याची मागणी केली.

कटुंबीयांनी आयसीयूतून बाहेर काढत ऐश्वर्या यांच्यावर उपचार सुरु केले. काही वेळातच त्यांच्या मृत्यू झाला. ही माहिती एका महिला डॉक्टरने कुटुंबियांना कळवताच त्यांचा संताप झाला. काही वेळापूर्वीच सामान्य स्थितीत असलेल्या रुग्णाचा लगेच मृत्यू कसा झाला? तज्ज्ञ डॉक्टर का आले नाहीत? असे अनेक प्रश्न विचारत कुटुंबीय, नातेवाईकांनी आयसीयूच्या बाहेर संताप व्यक्त करीत गोंधळ घातला.
यावेळी तेथे हजर असलेले डॉक्टर तिच्या कुटुंबियांना समाधानकारक उत्तरेच देऊ शकले नाहीत. अखेर काही जणांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद आटोक्यात आला. शवविच्छेदन न करताच मृतदेह ताब्यात देण्याचे ठरले.











