जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । अस्मानी माराने शेतकरी पूर्णतः नागवला तर कोरोना महामारीने व्यापारी, छोटे दुकानदार, मजूर, कष्टकरी, व्यवसायिक यांचे दिवाळे निघाले आहे. यात राज्य सरकार कुठेही अश्वासक असल्याचे दिसत नाही. तालुक्यात गेल्या शंभर वर्षात नसेल एवढी विदारक स्थिती असून महापूर व अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे.
शेतक-यांना सावरण्याची गरज असतांना वीज वितरण कंपनीने जुलमी पद्धतीने वीज तोडणी सुरु केली आहे. त्यामुळे पाच नोव्हेंबर रोजी काळी दिवाळी साजरी करु. हाती शिंगाडे घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार आहोत. असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.
सोमवारी आ. चव्हाण यांनी सायंकाळी सोशल माध्यमाव्दारे जनतेशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी, तसेच इतर सर्वसामान्य लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची ठोस मदत लोकांना दिली गेली नाही त्यामुळे राज्यसरकारच्या विरोधात या दिवाळीत आमदार मंगेश चव्हाण आंदोलनाचा फटाका फोडणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातुन स्पष्ट केले.